अंत्यसंस्काराहून परतत असताता भीषण अपघात, सुशांतसिंह राजपूतच्या नात्यातील पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 13:21 IST2021-11-16T12:54:31+5:302021-11-16T13:21:16+5:30
Accident News: बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पाच जण हे दिवंगत अभिनेता Sushant Singh Rajput याच्या नात्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

अंत्यसंस्काराहून परतत असताता भीषण अपघात, सुशांतसिंह राजपूतच्या नात्यातील पाच जणांचा मृत्यू
पाटणा - बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पाच जण हे दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत याच्या नात्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. लखिसराय जिल्ह्यातील पिपरा गावामध्ये शेखपुरा- सिकंदरा मार्गावर आज सकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला.
पहाटेच्यावेळी टाटा सुमो आणि ट्रक यांच्यात टक्कर होऊन हा अपघात झाला. ही टक्कर एवढी भीषण होती की त्यात सहा जण जागीच मृत्युमुखी पडले. तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी लखीसराय येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांपैकी पाच जण हे सुशांतसिंह राजपूतचे नातेवाईक होते. सुशांतसिंह राजपुतचे भाओजी आणि हरियाणा कॅडरचे आयपीएस अधिकारी ओमप्रकाश सिंह यांचे नातेवाईक या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. ओमप्रकाश सिंह यांच्या बहिणीवर अंत्यसंस्कार करून त्यांच्या बहिणीचे पती त्यांचे दोन मुलगे आणि मुलीसह एकूण १० जण सुमोमधून माघारी परतत होते. तेव्हा लखीसरायजवळ हा अपघात झाला.
मृतांची ओळख लालजीत सिंह, नेमानी सिंह, रामचंद्र सिंह, बेबी सिंह, अनिता सिंह आणि प्रितम सिंह अशी पटली आहे. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत.