सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२६: बंगळुरूमध्ये साज, सूर, संगीताची रंगली मधुर संध्याकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:35 IST2026-04-05T12:34:48+5:302026-04-05T12:35:31+5:30
बंगळुरूच्या प्रत्येक कणाकणांत सुरांचे अस्तित्व: डॉ. विजय दर्डा

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२६: बंगळुरूमध्ये साज, सूर, संगीताची रंगली मधुर संध्याकाळ
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: सूरसाधकांच्या सन्मानासह बंगळुरूमध्ये शुक्रवारी साज, सूर आणि संगीताची मनमोहक संध्याकाळ रंगली. मधुर बासरीवादन आणि गीतांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने प्रेक्षकांचे मन जिंकले. हा कार्यक्रम १३व्या लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा, कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक शंकर बिदरी, जैन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व जैन डीम्ड युनिव्हर्सिटीचे चॅन्सेलर चैनराज रायचंद जैन, टोयोटा किर्लाेस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष (बाह्य व्यवहार) ए. रमेश राव, प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला, १३व्या लोकमत सूर ज्योत्स्ना पुरस्काराचे विजेते डॉ. जयंथी कुमारेश (सरस्वती वीणावादक), प्रख्यात गायक व संगीतकार रघु दीक्षित, ‘लोकमत’चे वरिष्ठ उपाध्यक्ष व राष्ट्रीय प्रमुख अजित नायर, बी. एल. कनेक्टचे कपिल इंगळे, महाराष्ट्र मंडळाचे दीपक कुलकर्णी, हिंमतसिंगका ग्रुपच्या आकांक्षा हिंमतसिंगका, स्वाती तायल, चेतन तायल, ललित तायल, भागचंद दर्डा व अंजना चांडक यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. राज्यलक्ष्मी बिदरी, मनीष चांडक, व्हीट्रॅग ज्वेलर्सचे राजीव सिंग, लेखिका डॉ. सुजाता केळकर शेट्टी, कनिका अग्रवाल, लथिका पै आणि ट्रिप्सी डुगर हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२३’चे विजेता युवा बासरीवादक षड्ज गोडखिंडी यांनी 'हंसध्वनि' रागावर आधारित बासरीवादन सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले; तर २०२६च्या पुरस्कार विजेत्या गायिका शरयू दाते यांनी काही गीते गायली आणि 'ओ सजना बरखा बहार आयी...' हे गीत सादर करून खचाखच भरलेल्या चाैडाैय्या मेमोरियल हॉलमधील प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळवली.
भारताने जगाला संगीताचा वारसा दिला
सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध सरस्वती वीणावादक डॉ. जयंथी कुमारेश यांनी सांगितले की, आज प्रथमच भारताचे राष्ट्रीय वाद्य वीणेला असा उत्तम सन्मान मिळाला आहे. भारताने आपल्या कला आणि संस्कृतीचा नेहमीच अभिमान बाळगला आहे. भारताने खुल्या दिलाने आपला संगीताचा वारसा साऱ्या जगासमोर मांडला. बंगळुरूमध्ये आम्ही ज्योत्स्ना दर्डा, डॉ. विजय दर्डा यांच्या विचारांना
व स्वप्नांना पुढे नेत आहोत याबद्दल आनंद वाटतो.
कुणाल गांजावालाच्या गाण्यांवर प्रेक्षक मंत्रमुग्ध
समारंभात प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांच्या ‘लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट’ने रंगत आणली. त्यांनी तब्बल दोन तास मराठी, हिंदी आणि कन्नड भाषांतील चित्रपटगीतांची मैफल रंगवली. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या दरम्यान त्यांनी बॉलिवूडचे दिवंगत गायक केके यांना श्रद्धांजली म्हणून काही गाणीही सादर केली.
बंगळुरूच्या प्रत्येक कणाकणांत सुरांचे अस्तित्व : डॉ. विजय दर्डा
स्वागत भाषणात डाॅ. विजय दर्डा यांनी सांगितले की, बंगळुरू हे फक्त आयटी हब नाही; तर येथील कणाकणांत सुरांचे अस्तित्व आहे. येथील लोक अतिशय जिव्हाळ्याने संगीत ऐकतात. कन्नडमध्ये शास्त्रीय संगीताचा पाया अतिशय मजबूत आहे.
‘सर्वांनी प्रेम, सद्भाव, शांततेचा स्वीकार करावा’
महाराष्ट्रातील नाशिक येथे जन्मलेले प्रसिद्ध गायक व संगीतकार रघु दीक्षित यांनी त्यांची आई म्हणत असलेल्या ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात...’ या मराठी गाण्याच्या काही ओळी समारंभात म्हणून दाखविल्या. सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने सन्मानित रघु दीक्षित यांनी कर्नाटकातील १७व्या शतकातील संत शिशुताल शरीफा यांच्या कन्नड गीताच्या काही ओळी सादर करून त्याचा अर्थही स्पष्ट केला. दीक्षित म्हणाले की, सध्याच्या काळात या ओळी अत्यंत समर्पक आहेत. यात मानवता जपण्यावर भर देण्यात आला आहे; परंतु दुर्दैवाने आज मानवतेकडे दुर्लक्ष होत आहे आणि आपण एकमेकांशी भांडत आहोत. सर्वांनी प्रेम, सद्भाव आणि शांततेचा स्वीकार केला पाहिजे.