पहिली बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावीच लागेल; सीबीएसईचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 06:03 IST2026-02-17T06:03:24+5:302026-02-17T06:03:53+5:30
सीबीएसई २०२६ पासून दहावीच्या दोन बोर्ड परीक्षांनी सुरुवात करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण आले आहे. दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू होतील. यामध्ये ४६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत.

पहिली बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावीच लागेल; सीबीएसईचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या बोर्ड परीक्षेस बसणे अनिवार्य करण्यात आले आहे. जे पहिल्या परीक्षेत किमान तीन विषय देणार नाहीत, त्यांना अनिवार्य पुनर्परीक्षा श्रेणीत ठेवले जाईल, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) म्हटले आहे.
सीबीएसई २०२६ पासून दहावीच्या दोन बोर्ड परीक्षांनी सुरुवात करत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण आले आहे. दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू होतील. यामध्ये ४६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत.
दुसरी परीक्षा कोणासाठी?
१) तीन मुख्य विषयांत सुधारणा करायची असल्यास
२) कंपार्टमेंट आले असल्यास; कंपार्टमेंट व सुधारणा दोन्ही करायचे असल्यास
३) पास असूनही दुसऱ्या विषयात सुधारणा करायची असल्यास
...तर दुसऱ्या परीक्षेस बसता येणार नाही
पहिल्या परीक्षेला बसणे अनिवार्य : पहिली बोर्ड परीक्षा न देता थेट दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही.
तीन विषयांत सुधारण्याची संधी : जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत पास झाले आहेत, त्यांना विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र, भाषा यापैकी कोणत्याही तीन मुख्य विषयांत गुण सुधारण्यासाठी दुसरी परीक्षा देता येईल.
जे विद्यार्थी गैरहजर होते त्यांच्यासाठी नियम : जर एखादा विद्यार्थी पहिल्या परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांत अनुपस्थित असेल, तर त्याला दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना अनिवार्य पुनर्परीक्षा श्रेणीत ठेवले जाईल. पुढील वर्षी फेब्रुवारीतील मुख्य परीक्षा द्यावी लागेल.
कंपार्टमेंट आलेल्या विद्यार्थ्यांसाठी : ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेत कंपार्टमेंट आले आहे, त्यांना दुसऱ्या परीक्षेत त्याच श्रेणीत बसण्याची परवानगी आहे.
अतिरिक्त विषयाबाबत नियम : दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थी अतिरिक्त विषयाची परीक्षा देऊ शकणार नाहीत.