Bengaluru Stampede: बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 06:54 IST2025-06-05T06:54:13+5:302025-06-05T06:54:52+5:30

Bengaluru Stampede: ही घटना घडल्यानंतर खेळाडूंचा सत्कार सोहळा दहा मिनिटांत संपविण्यात आला.

Stampede during Bengaluru RCB celebrations, over-excitement leads to deaths; 11 killed, 33 injured | Bengaluru Stampede: बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी

Bengaluru Stampede: बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी

बंगळुरू: आयपीएलच्या विजेतेपदावर तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपले नाव कोरणाऱ्या बंगळुरूच्या संघाची विजयी मिरवणूक बुधवारी काढण्यात आली. यानंतर बंगळुरू संघातील क्रिकेटपटूंचा सत्कार सोहळा  चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता. यासाठी स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांची गर्दी उसळली होती. परंतु, ही गर्दी पोलिसांच्या  नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथे चेंगराचेेंगरी झाली. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर खेळाडूंचा सत्कार सोहळा दहा मिनिटांत संपविण्यात आला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने म्हणजे सुमारे दोन ते तीन लाख लोक चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात जमले होते. चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत कर्नाटक सरकार देणार आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. बंगळुरू संघाने चेंगराचेंगरीच्या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. या घटनेबद्दल कळल्यानंतर आम्हाला खूप दुःख झाले. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो, असे बंगळुरू संघाने म्हटले आहे.

आयोजकांनी कार्यक्रमाची नीट पूर्वतयारी केली नाही : बीसीसीआय

बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया म्हणाले  की, आयोजकांनी कार्यक्रमाची नीट पूर्वतयारी केली असती तर अशी घटना घडली नसती. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धूमल म्हणाले, हा बीसीसीआयचा अधिकृत कार्यक्रम नव्हता. या दुर्घटनेची चौकशी झालीच पाहिजे. तर मृतांचे वारसदार व जखमींना शक्य ती मदत करण्याची ग्वाही बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.  

चेंगराचेंगरीची घटना हृदयद्रावक; पंतप्रधान माेदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. चेंगराचेंगरीची घटना अतिशय हृदयद्रावक आहे. त्यात ज्यांनी आप्तस्वकीय गमावले त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमी लवकर बरे होवोत अशा भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या दुर्घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

  • बंगळुरुचा संघ विशेष विमानाने पोहोचल्यानंतर राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संघाचे अभिनंदन केले. त्यानंतर संघाला मिरवणुकीद्वारे चिन्नास्वामी स्टेडियमकडे घेऊन जाण्याचे नियोजन होते. परंतु, नेमकी याचवेळी चेंगराचेंगरी झाली. 
  • चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर असंख्य लोक जमा झाले होते. त्यावेळी गर्दीत गुदमरल्याने एक लहान मुलगा बेशुद्ध पडला. महेश नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले, विराट कोहलीला पाहण्यासाठी अनेक लोक आले होते. त्या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते.
  • कर्नाटक सरकारने बाधित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करावी व दिलासा द्यावा. कोणताही सोहळा हा मानवी जीवनापेक्षा मोलाचा नसतो. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सुरक्षेच्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या दुर्घटनेबाबत म्हटले आहे. तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शोक व्यक्त केला.  

Web Title: Stampede during Bengaluru RCB celebrations, over-excitement leads to deaths; 11 killed, 33 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.