तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 21:30 IST2025-09-27T21:29:15+5:302025-09-27T21:30:50+5:30
या दुर्घटनेमुळे विजयला आपले भाषण अर्ध्यावर थांबवावे लागले. त्याने मंचावरून शांतता राखण्याचे आणि रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून देण्याचे आवाहन केले.

तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
तामिळनाडूतील करूर येथे अभिनेत्याच्या भूमिकेतून नेत्याच्या भूमिकेत आलेल्या तमिलगा वेत्री कझगम (TVK) प्रमुख सुपरस्टार विजय याच्या रॅलीदरम्यान भीषण चेंगराचेंगरी झाली. यात महिला आणि मुलांसह अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. करूरचे डीएमके आमदार सेंथिल बालाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेते महिला आणि मुलांसह एकूण 31 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत.
प्रचंड गर्दीमुळे अनेक कार्यकर्ते आणि मुले बेशुद्ध झाली. या दुर्घटनेमुळे विजयला आपले भाषण अर्ध्यावर थांबवावे लागले. त्याने मंचावरून शांतता राखण्याचे आणि रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून देण्याचे आवाहन केले.
डीएमके मंत्री सेंथिल बालाजी आणि करूरचे जिल्हाधिकारी तातडीने रुग्णालयात -
घटनेची माहिती मिळताच डीएमके मंत्री सेंथिल बालाजी आणि करूरचे जिल्हाधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले आणि जखमींची विचारपूस केली. तसेच, घटनास्थळी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आणि गर्दीतील लोकांना अस्वस्थ वाटू नये म्हणून पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या गोंधळात एक 9 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. दरम्यान, अभिनेता विजयने पोलिस आणि कार्यकर्त्यांना तिचा शोध घेण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती यावेळी केली.
पुढील सहा महिन्यांत तामिळनाडूमध्ये सत्तांतर होणार -
दरम्यान, आपल्या भाषणातून विजयने माजी डीएमके मत्री सेंथिल बालाजी यांच्यावर नाव न घेता टीकाही केली. तो म्हणाला, डीएमकेने करूरमध्ये विमानतळ उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नंतर, केंद्राकडे याची मागणी केली. यावेळी, पुढील सहा महिन्यांत तामिळनाडूमध्ये सत्तांतर होणार आणि राजकीय चित्र बदलणार, असा दावाही त्याने केला. ही रॅली 2026 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, विजयच्या राज्यव्यापी अभियानाचा एक भाग होती. घटनेनंतर प्रशासन आणि आयोजकांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख -
या घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "तमिलनाडूच्या करूर येथील राजकीय रॅलीदरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत दु:खद आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या कठीण प्रसंगी त्यांना शक्ती मिळो. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हायवेत, यासाठी प्रार्थना करतो."
The unfortunate incident during a political rally in Karur, Tamil Nadu, is deeply saddening. My thoughts are with the families who have lost their loved ones. Wishing strength to them in this difficult time. Praying for a swift recovery to all those injured.
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2025