Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:14 IST2025-06-09T13:13:03+5:302025-06-09T13:14:37+5:30
सोनम रघुवंशी सापडली आणि तिने दिलेला कबुली जबाब ऐकून सगळेच हादरून गेले. या प्रकरणाचं गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश मिळालं आहे.

Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये राहणारे राजा आणि सोनम रघुवंशी आपल्या दाम्पत्य जीवनाची गोड सुरुवात करण्यासाठी मेघालयला गेले होते. मात्र, या ठिकाणी दोघेही बेपत्ता झाले. नंतर युद्धपातळीवर त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान राजाचा मृतदेह सापडला आणि खळबळ उडाली. त्यानंतर, सोनम सापडली आणि तिने दिलेला कबुली जबाब ऐकून सगळेच हादरून गेले. या प्रकरणाचं गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश मिळालं आहे.
कधी झाली घटनेची सुरुवात?
इंदूर येथील नवविवाहित जोडपे राजा आणि सोनम रघुवंशी मेघालयमधील शिलाँगमध्ये हनिमूनसाठी पोहोचले होते. परंतु, २३ मे रोजी चेरापुंजीच्या नोंगरियाट गावातील 'लिव्हिंग रूट ब्रिज'ला भेट दिल्यानंतर ते दोघे अचानक बेपत्ता झाले. या प्रकरणात त्यांना शोधण्यासाठी पोलीस तापस सुरू झाला. आणि वेगवेगळ्या घटनांमधून पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळत गेले.
पोलिसांना मिळालेले धागेदोरे
राजा आणि सोनम यांचे लग्न ११ मे २०२५ रोजी इंदूरमध्ये झाले होते. त्यांच्या हनिमूनची सुरूवात २० मे रोजी मेघालयातील शिलाँगमध्ये झाली. मात्र, त्याच्या नंतरच्या तीन दिवसांमध्ये त्यांची अपहरण व हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज, सापडलेली वस्तू आणि हत्येचा संशय!
पोलिसांना सगळ्यात आधी राजा आणि सोनम यांचे शिलाँगमधील एका होमस्टेमध्ये २१ मे रोजी चेक-इन करतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. यानंतर त्यांना राजाच्या मृतदेहाजवळ काही महत्त्वाच्या वस्तू मिळाल्या, ज्यामध्ये एक पांढरा शर्ट, औषधांची पाकीटं, स्मार्टवॉच आणि तुटलेली मोबाईल स्क्रीन यांचा समावेश होता. राजाचा सोन्याचा चेन, अंगठी आणि पाकीट गायब होते, ज्यामुळे दरोड्याचा संशय व्यक्त झाला.
गूढ उलगडताना बांगलादेश सीमेशी संबंध
त्यांच्या स्कूटीचे लोकेशन बांगलादेश सीमेजवळ आढळल्याने या प्रकरणात एक नवे वळण आले. राजाचा भाऊ विपिन याने असा दावा केला की, या भागात पर्यटकांना लक्ष्य करणारी एक टोळी आहे जी पुरुषांना मारते आणि महिलांचे अपहरण करते. या दृष्टीकोनामुळे मानवी तस्करीच्या सिद्धांताला जोर मिळाला होता.
धक्कादायक खुलासा, सोनमच झाली बेवफा!
१७ दिवसांच्या बेपत्ता नाट्यानंतर, ८ जून २०२५ रोजी सोनम गाझीपूर, उत्तर प्रदेश येथील एका ढाब्यावर दिसली. तिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत खुलासा केला की, पती राजा रघुवंशीचा खून करण्यासाठी तिनेच भाडोत्री गुंड ठेवले होते. पोलिसांनी तिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली. सोनम आणि अन्य तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतले आहे.
साक्षीदारांचा महत्त्वाचा रोल
गाईड अल्बर्ट पीडी यांनी २३ मे रोजी सकाळी १० वाजता राजा आणि सोनमला तीन पुरूषांसह ३००० पायऱ्या चढताना पाहिले होते. ही महत्त्वाची साक्ष पोलिसांना गुन्ह्याच्या तपासात मदत करणारी ठरली. सोनमचे दुसऱ्या तरूणावर प्रेम असल्याने तिने हे कृत्य केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.