"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास..."; अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:15 IST2026-04-13T16:14:42+5:302026-04-13T16:15:12+5:30
शाह म्हणाले की, "बंगालमध्ये सध्या काही लोकांना चार लग्न करण्याची सूट आहे, मात्र भाजप सत्तेत आल्यास, 'यूसीसी' लागू करून यावर कायमची बंदी घातली जाईल. सर्वांसाठी कायदा समान असायला हवा की नको?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला केला.

"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास..."; अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यातच सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बीरभूम जिल्ह्यातील मयूरेश्वर येथे जाहीर सभा घेत तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार हल्ला करत कडाडून टीका केली. या सभेत त्यांनी राज्यात समान नागरिक संहिता (UCC) लागू करण्याच्या भाजपच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला. शाह म्हणाले की, "बंगालमध्ये सध्या काही लोकांना चार लग्न करण्याची सूट आहे, मात्र भाजप सत्तेत आल्यास, 'यूसीसी' लागू करून यावर कायमची बंदी घातली जाईल. सर्वांसाठी कायदा समान असायला हवा की नको?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला केला.
शाह म्हणाले, आम्ही आमचे संकल्प पत्र जाहीर केले आहे. ५ मे रोजी भाजपचे सरकार आल्यास राज्यात मोठा बदल दिसेल. भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत त्यंनी आरोप केला की, राज्य सरकारमधील भ्रष्टाचारामुळे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेला मिळत नाही. तसेच, भाजपचे सरकार आल्यास राज्यातील महिला दिवस-रात्र स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे काम करू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"जनता आता या बॉम्बचे उत्तर मतांनी देईल" -
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात बोलताना अमित शाह म्हणाले, "गेल्या १५ वर्षांत टीएमसीने बंगालला बॉम्ब आणि गोळ्यांचे कोठार बनवले. मात्र, जनता आता या बॉम्बचे उत्तर मतांनी देईल आणि राज्यात 'डबल इंजिन' सरकार स्थापन होईल." त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर बहुसंख्यक समुदायाला घाबरवण्याचा आणि तुष्टीकरणाचाही आरोप केला.
"...तर ४ मे नंतर त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात येईल" -
दरम्यान, मुर्शिदाबादमधील दंगे आणि रामनवमीच्या मिरवणुकीवरील हल्ल्यांचा उल्लेख करत शाह यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी आहे. "मतदानाच्या दिवशी टीएमसीच्या गुंडांनी घरातच राहावे, अन्यथा ४ मे नंतर त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात येईल." असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.