पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 14:48 IST2024-06-15T12:35:54+5:302024-06-15T14:48:19+5:30
मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी मिंटोकगुंग येथे एका उच्चस्तरीय बैठक घेतली.

पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात संततधार पावसाने झालेल्या भूस्खलनामुळे १५ परदेशी नागरिकांसह १२०० हून अधिक पर्यटक अडकले आहेत. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. राज्यात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मिळलेल्या वृत्तानुसार, जवळवास १२०० हून अधिक पर्यटक हे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकून पडले आहेत. सिक्कीम पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे प्रधान सचिव सी एस राव यांनी एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. मंगन जिल्ह्यातील लाचुंगमध्ये भारतातील तीन, बांगलादेशातील १० जण अडकले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी मिंटोकगुंग येथे एका उच्चस्तरीय बैठक घेतली. डोंगराळ राज्याला भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी अडकलेल्या पर्यटकांना आहेत त्याठिकाणी थांबा आणि धोका पत्करू नका असं सांगितलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या सर्व पर्यटकांसाठी रेशनचा पुरेसा साठा आहे. हवामानाच्या परिस्थितीनुसार सर्व पर्यटकांना हवाई मार्गाने आणण्यासाठी मुख्य सचिव कार्यालयाने केंद्राशी बोलणी सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. मंगनमधील जिल्हा प्रशासन, पोलीस आणि पर्यटन अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अडकलेल्या लोकांची सुटका करत आहे.
अनेक घरं गेली पाण्याखाली
आणखी एका अधिकाऱ्याने सांगितलं की, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालं ज्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली, नुकसान झालं, तर विद्युत खांब वाहून गेले. संततधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. संगकलांग येथे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांधलेला पूल कोसळला, ज्यामुळे उत्तर सिक्कीममध्ये मोठ्या संख्येने पर्यटक अडकले.