"यापुढे तरी प्रवाशांना असा त्रास होणार नाही, यासाठी काही उपाययोजना एअर इंडियाचे व्यवस्थापन करणार आहे की, लवकर पोहचण्याच्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत राहणार आहे?", असा संतप्त सवाल केला आहे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी! एअर इंडियाच्याविमानातूनशिवराज सिंह चौहान यांच्यासोबत एक प्रसंग घडला, तो त्यांनी सांगितला आणि एअर इंडियाच्या व्यवस्थापनाचे याकडे लक्ष वेधले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शिवराज सिंह चौहान यांनी एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला. त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला आणि टाटा व्यवस्थापनाकडे गेल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, असे मला वाटले होते, पण घोर निराशा झाली, असे ते म्हणाले.
शिवराज सिंह चौहान यांची पोस्ट वाचा जशीच्या तशी
"आज मला भोपाळवरून दिल्लीला यायचे होते. पुसा येथे कृषी मेळाव्याचे उद्घाटन, कुरुक्षेत्रमध्ये नैसर्गिक शेती मिशनची बैठक आणि चंदिगढमध्ये शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळांसोबत चर्चा करायची आहे."
"मी एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक AI436मध्ये तिकीट आरक्षित केले होते. मला सीट क्रमांक ८सी आरक्षित झाला होता. मी जाऊन सीटवर बसलो. सीट तुटलेले होते आणि खड्डा पडलेला होता. मला बसण्यासाठी त्रासदायक होते."
"मी विमानातील कर्मचाऱ्यांना विचारले की, सीट खराब होते, तर आरक्षित का केले गेले? त्यांनी सांगितले की, यांची माहिती व्यवस्थापनाला आधीच देण्यात आली होती की, हे आसन चांगले नाहीये. याचे तिकीट विक्री करू नये. अशी एक नाही, तर अनेक आसने आहेत"
"विमानातील इतर काही प्रवाशांनी मला त्यांच्या सीट बदलून त्यांच्या सीटवर बसण्याचा आग्रह केला. पण, माझ्यासाठी मी इतरांना का त्रास देऊ? मी निर्णय घेतला की याच सीटवर बसून प्रवास पूर्ण करायचा."
"माझी अशी समजूत झाली होती की, टाटा व्यवस्थापनाकडे आल्यानंतर एअर इंडियाची सेवा चांगली झाली असेल, पण हा माझा भ्रम होता. मला झालेल्या त्रासाचे मला काही वाटत नाही. पण, प्रवाशांकडून पूर्ण पैसे घेऊन त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे नैतिकतेला धरून नाही. हा प्रवाशांसोबत केलेला विश्वासघात नाहीये का?"
"यापुढे प्रवाशांना असा त्रास होणार नाही, यासाठी एअर इंडिया व्यवस्थापन काही उपाययोजना करणार आहे की, लवकर पोहचण्याच्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत राहणार आहे?", असा सवाल शिवराज सिंह चौहान यांनी केला.