"देशाच्या नेतृत्त्वाने सुसंवादाची स्थिती ठेवली नाही, त्याची किंमत देश देतोय"; शरद पवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:26 IST2025-06-10T15:20:26+5:302025-06-10T15:26:53+5:30
देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेजारील देशांसोबत सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.

"देशाच्या नेतृत्त्वाने सुसंवादाची स्थिती ठेवली नाही, त्याची किंमत देश देतोय"; शरद पवारांची टीका
Sharad Pawar On Operation Sindoor: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन केले. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही सरकारवर टीका केली नाही, तर सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले असं शरद पवार म्हणाले. मात्र यावेळी शरद पवार यांनी देशाच्या शेजारील देशांमध्ये असलेल्या परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आरसा दाखवला आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी शेजारील देशांसोबत सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वर्धापनदिन सोहळे पार पडत आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी देशाच्या शेजारील देशांसोबतच्या संबंधावर लक्ष वेधले. यावेळी पवार यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख न करता निशाणा साधला. ज्या बांग्लादेशसाठी भारताने त्याग केला तोसुद्धा आपल्यासोबत नाही, असं शरद पवार म्हणाले.
"राष्ट्राच्या हितामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कधी राजकारण करणार नाही. पहलगाममध्ये काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्यामागे कोण आहे याची चर्चा देशभरात झाली. त्यावेळी आम्ही सरकारवर टीका केली नाही. आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांवर हल्ले होत असतील तर शासनाने कोणतीही भूमिका घेतली त्याचे समर्थन आम्ही करू. याच्यामध्ये राजकारण आणणार नाही असं सांगितलं. आज गांभीर्याने या सगळ्या प्रश्नांचा विचार व्हायला हवा," असं शरद पवार यांनी म्हटलं.
"आज तुम्ही देशाचा नकाशा बघितला तर काश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे, शेजारी पाकिस्तान आहे. खाली गेलात की श्रीलंका आहे. सबंध देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण भारत यांच्यामध्ये सध्या काय स्थिती आहे. एक काळ असा होता की जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व आणि भारत सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश असा या देशाचा लौकिक होता. आज पाकिस्तानसोबत आपले संबंध चांगले नाहीत, चीनसोबत आपले संबंध चांगले नाहीत, बांगलादेश या देशासाठी भारताने प्रचंड त्याग केला. एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले. एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही. श्रीलंकेबाबतही चिंता आहे. त्या ठिकाणी असलेला चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहेय सबंध देश आणि आपल्या शेजारचे देश यांच्यात सुसंवाद आहे अशी म्हणण्याची स्थिती नाही. याचा अर्थ हा आहे की देशाचे नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली नाही. त्याची किंमत ही देशाला द्यावी लागते आहे," असंही शरद पवार म्हणाले.