वयाच्या १३ व्या वर्षी डुग्गू घेणार दीक्षा; आयुष्यातील सर्व सुखसोयीचा करणार त्याग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:25 IST2025-05-30T17:24:29+5:302025-05-30T17:25:06+5:30
दुर्गमध्ये श्री आदित्यनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रेस्टद्वारे दीक्षा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

वयाच्या १३ व्या वर्षी डुग्गू घेणार दीक्षा; आयुष्यातील सर्व सुखसोयीचा करणार त्याग
दुर्ग - आई वडिलांचे प्रेम, लहानपणीच्या खोड्या, मस्ती, बिनधास्त जीवन आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगणं म्हणजे बालपण..आईच्या कुशीत शिरणे, तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपणे म्हणजे बालपण... राजस्थानच्या जोधपूर इथं १ जून २०१२ साली जन्मलेला चिमुकला रुहान मेहता याला सर्वजण लाडाने डुग्गू म्हणतात. याच डुग्गूने आयुष्यातील मोह माया त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. सुंदर आयुष्यातील क्षणांचा त्याग करून १३ वर्षीय डुग्गू वैराग्याचं आयुष्य जगणार आहे.
दुर्ग येथे आयोजित दीक्षा समारोहात रुहान मेहता उर्फ डुग्गू दीक्षा ग्रहण करणार आहे. आयुष्यातील सर्व सुखांचा त्याग करून वैराग्याच्या मार्गे जाण्याचा कठीण निर्णय त्याने घेतला आहे. डुग्गू आजतागायात शालेय शिक्षणापासून दूर आहे. त्याने कधीही नर्सरी, केजी वर्गाचे शिक्षणही घेतले नाही. लहानपणापासून त्याला धार्मिकतेची ओढ लागली. त्यानंतर आता तो स्वत: वैराग्याच्या मार्गावर चालणार आहे. इतक्या छोट्या वयात डुग्गूला जैन धर्माच्या ४५ आगमपैकी २२ आगम पाठ आहेत. चार कर्मग्रंथातील २ हजार सूत्र पाठ केले आहेत. प्रतिक्रमण, संस्कृत आणि अनेक प्राचीन भजन डुग्गूला तोंडपाठ आहेत. डुग्गूला दुर्ग येथे विनय कुशल मुनी दीक्षा देतील. दुर्गमध्ये श्री आदित्यनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रेस्टद्वारे दीक्षा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
दीक्षा घेतल्यानंतर कसं असेल डुग्गूचे जीवन?
दीक्षा घेतल्यानंतर डुग्गू पूर्णपणे सन्यासी जीवन जगणार आहे. जैन साधू, साध्वी यांचे जीवन संतुलित आणि शिस्तीचे असते. सूर्यास्तानंतर जैन साधू पाण्याचा एक थेंब आणि अन्नाचा एक कणही घेत नाहीत. सूर्योदय झाल्यानंतरही जवळपास ४८ मिनिटे वाट पाहतात. त्यानंतर पाणी पितात. जैन साधू कधीही स्वत:साठी भोजन बनवत नाहीत. ना त्यांच्या आश्रमात भोजन बनते. हे लोक घरोघरी जात भोजनासाठी भीक्षा मागतात. या प्रथेला गोचरी म्हटलं जाते. जैनमुनी कुठल्याही प्रवासासाठी वाहनाचा वापर करत नाहीत. जितके होत असेल तितके पायपीट करतात. एका स्थानावर अधिक काळ राहत नाहीत. पावसाळ्याचे ४ महिने वगळता इतर दिवशी सतत प्रवास सुरू असतो.
दीक्षा घेतल्यानंतर ५ वचन पाळावे लागतात
कुठल्याही जीवित प्राण्याला तन, मन अथवा वचन याने हानी न पोहचवणे
नेहमी खरे बोलणे आणि सत्याला साथ देणे
इतरांच्या सामानावर वाईट नजर न टाकणे, लालसेपासून दूर राहणे
शरीराच्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे, कुणासोबतही संबंध बनवू नये
जितकी गरज तितकेच स्वत:जवळ ठेवावे, आवश्यकतेपेक्षा अधिक ठेवू नये