भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी अड्ड्यांचे जबर नुकसान झाले होते. तसेच या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले होते. दरम्यान, या कारवाईनंतर खवळलेल्या पाकिस्ताननेभारतावर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मूपासून भूजपर्यंत विविध भागात केलेले हल्ले हाणून पाडल्यानंतर आता आज पाकिस्तानने पुन्हा एकदा आगळीक केली आहे. पाकिस्तानने जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच सांबा परिसरात पाकिस्तानकडून भीषण गोळीबार सुरू आहे. अखनूर परिसरातही गोळीबार सुरू आहे.
पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र हल्ल्याचे संकेत मिळताच भारताने ए-४०० प्रणाली सक्रिय केली असून, पाकिस्तानने जम्मू आणि सांबाच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे पाडण्यात आल्याचं प्राथमिक वृत्त आहे. त्याशिवाय सांबा आणि अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानने भीषण गोळीबार सुरू केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरएसपुरा विभागात ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. तसेच जम्मू शहरामध्ये मोबाईल नेटवर्क जॅम झाले आहेत. हल्ल्याचे सायरन वाजत आहेत. तसेच सतवारी कॅम्पवरही हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, काल मध्यरात्री मध्यरात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिमेकडील काही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न केले. यात अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नाल, फलौदी, उत्तरलाई आणि भूज या ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचाचा प्रयत्न केला होता. मात्र भारताच्या एस-४०० प्रणालीने हे सर्व हल्ले परतवून लावले.