नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत काही दिवसांपूर्वी मंगोलपुरी परिसरात रिंकू शर्मा (Rinku Sharma) या तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. रिंकू भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता. त्यामुळे त्याच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली असून राजकारण तापलं आहे. याच दरम्यान दिल्लीत सत्ताधारी पार्टी असलेल्या आम आदमी पार्टी (AAP) ने गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपने रिंकू शर्माच्या हत्येसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचं म्टटलं आहे.
आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी अमित शहांवर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्लीत हत्या होणं ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. रिंकू शर्माच्या हत्येला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच जबाबदार आपने या प्रकरणात असून शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. तसेच भाजपा सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत असं देखील सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. तसेच "दिल्लीत हत्येच्या घटना होणं ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. या हत्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार आहेत. भाजपा सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत" असं आपने म्हटलं आहे.
"दिल्लीतील कायदा सुव्यवस्था खराब झाली, हत्येच्या घटना होणं ही आता सर्वसामान्य बाब"
"दिल्लीतील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरल्याचं अनेक घटनांतून समोर येत आहे. आम्ही हत्येचा तीव्र निषेध करतो" असं देखील सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. विश्व हिंदू परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, राम मंदिरासाठी निधी जमा करण्यासाठी रिंकू शर्माची हत्या करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असं मत विहिंपचे सह सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केलं. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितलं की, रिंकूचा भाऊ विहिंप युवा संघटनेचा सदस्य असून अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यासाठी निधी जमा करण्याचा कामात रिंकू सक्रियपणे भाग घेत होता.
सोशल मीडियावर न्याय मिळावा अशी मागणी
ट्विटरवर रिंकू शर्माला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. #JusticeForRinkuSharma टॉप ट्रेंड करीत आहे. #HindusLivesMatter हॅशटॅग देखील खूप वापरला जात आहे. अनेक सेलिब्रेटींनीही याबाबत आपले मत व्यक्त करून न्यायाची मागणी केली आहे. रिंकू शर्माच्या हत्येबाबत न्यायाची मागणी करणार्यांमध्ये कंगना राणौत, प्रणिता सुभाष, आंध्र प्रदेश भाजपाचे महासचिव एस. के. विष्णुवर्धन रेड्डी, यू ट्यूबर एल्विश यादव इत्यादींचा समावेश आहे.