४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:19 IST2025-12-27T13:18:31+5:302025-12-27T13:19:10+5:30
लाल किल्ल्यावरील हल्ल्यासाठी वापरले ४० किलो घातक स्फोटके वापरल्याचे तपासात समोर आलं आहे.

४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
Red Fort Car Bomb Blast Case: दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट कोणताही आकस्मिक प्रकार नसून, गेल्या दोन वर्षांपासून रचल्या गेलेल्या एका मोठ्या दहशतवादी कटाचा भाग होता. या स्फोटात तब्बल ४० किलो हाय-ग्रेड स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे फॉरेन्सिक तपासात निष्पन्न झाले आहे.
२०२३ पासून सुरू होती तयारी
तपासातून असे समोर की, मुख्य आरोपी उमर नबी आणि त्याच्या साथीदारांनी २०२३ मध्येच या हल्ल्याची योजना आखली होती. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांचा पहिला निशाणा जम्मू-काश्मीर होता. मात्र, जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्यांच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा देशाची राजधानी दिल्लीकडे वळवला.
घातक रसायनांचा वापर
फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी अमोनियम नायट्रेट आणि ट्राइऐसीटॉन ट्राइपेरोक्साइड यांसारख्या अतिशय दुर्मिळ आणि घातक रसायनांचे अंश सापडले आहेत. अमोनियम नायट्रेट याचा वापर खत म्हणून केला जात असला तरी, मोठ्या प्रमाणात स्फोट घडवण्यासाठी हे अत्यंत प्रभावी ठरते. ट्राइऐसीटॉन ट्राइपेरोक्साइड हे एक अत्यंत संवेदनशील आणि दुर्मिळ केमिकल असून त्याच्या विक्रीवर आणि वाहतुकीवर कडक निर्बंध आहेत.
कुठून आली इतकी स्फोटके?
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हरियाणातील सोहना, गुडगाव आणि नूह येथील स्थानिक दुकानांमधून अमोनियम नायट्रेट आणि खतांचा साठा जमवला होता. यापूर्वी फरीदाबादच्या धौज गावातून एका आरोपीच्या घरातून ३५८ किलो स्फोटक साठा जप्त करण्यात आला होता, ज्याचा संबंध या प्रकरणाशी जोडला जात आहे.
आतापर्यंत ९ जणांना अटक
या कटात सामील असल्याच्या संशयावरून आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. दिल्ली न्यायालयाने यातील ७ मुख्य आरोपींच्या न्यायिक कोठडीत ८ जानेवारी २०२६ पर्यंत वाढ केली आहे. यामध्ये काही डॉक्टर आणि मौलवींचाही समावेश असल्याचे समोर आल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने डॉ. अदील राथर, डॉ. मुजम्मिल गनई, डॉ. शाहीन सईद, मौलवी इरफान अहमद वागे, जासिर बिलाल वानी, आमिर राशिद अली आणि सोयब या सात आरोपींच्या न्यायिक कोठडीत ८ जानेवारी २०२६ पर्यंत वाढ केली आहे.