धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 15:15 IST2026-04-11T15:14:30+5:302026-04-11T15:15:05+5:30
गावात मच्छरांचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, आता रात्रीच्या वेळी लोकांना गावात राहणं खूप कठीण झालं आहे.

AI फोटो
राजकोटमधील वेजा गाव सध्या अशा एका विचित्र आणि गंभीर समस्येचा सामना करत आहे, जे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गावात मच्छरांचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, आता रात्रीच्या वेळी लोकांना गावात राहणं खूप कठीण झालं आहे. वेजा गावातून वाहणाऱ्या नदीमध्ये जलपर्णीचं साम्राज्य इतकं पसरलं आहे की, संपूर्ण नदीत फक्त जलपर्णीच दिसत आहे. जलपर्णी पसरण्याचं मुख्य कारण म्हणजे साचलेली घाण आणि प्रदूषित पाणी.
जलपर्णी मच्छरांच्या उत्पत्तीसाठी अत्यंत पोषक ठरत आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मच्छर होत आहेत. दिवसा हे मच्छर जलपर्णीमध्ये लपून राहतात आणि रात्र होताच बाहेर पडून गावात शिरतात. मच्छरांची संख्या कोटींच्या घरात असेल असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण मच्छरांचे थवेच्या थवे गावावर आक्रमण करतात. धक्कादायक बाब म्हणजे मच्छरांच्या त्रासामुळे गावातील मुलांचं लग्न देखील होत नाही. लग्नासाठी कोणीही मुलगी देत नाही.
मच्छरांच्या त्रासामुळे गावात रात्र काढणं अशक्य
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखादा पाहुणा किंवा नातेवाईक गावात आला, तर तो संध्याकाळ होताच परत निघून जातो, कारण बाहेरील व्यक्तीला या मच्छरांच्या त्रासामुळे गावात रात्र काढणं अशक्य आहे. मच्छरांची संख्या एवढी जास्त आहे की, गावातील रस्त्यांवरून चालताना ते तोंड, नाक आणि कानातही शिरतात. या परिस्थितीमुळे ग्रामस्थ स्वतःला हतबल मानत आहेत.
मच्छर चावल्यामुळे गुरं आजारी
ग्रामीण भाग असल्याने येथे गुरांची संख्याही मोठी आहे. ग्रामस्थांना आपल्या जनावरांचं मच्छरपासून रक्षण करण्यासाठी त्यांना मच्छरदाणीत ठेवावं लागत आहे. यासाठी त्यांनी मोठ्या आकाराच्या मच्छरदाण्या तयार केल्या आहेत. मच्छर चावल्यामुळे गुरं आजारी पडत असून त्यांनी दूध देणंही बंद केलं आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
या गावाची भौगोलिक स्थितीही प्रशासकीय अडथळ्याचं कारण ठरत आहे. अर्ध गाव राजकोट महानगरपालिकेच्या अंतर्गत येतं, तर अर्धे गाव RUDA (राजकोट अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी) च्या हद्दीत येतं. उपसरपंचांनी सांगितलं की, त्यांनी दोन्ही ठिकाणी तक्रारी केल्या आहेत, परंतु दोन्ही संस्था जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. उपसरपंचांनी असा इशाराही दिला आहे की, जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर यापुढेही गावातील तरुणांना लग्नासाठी कोणीही मुलगी देणार नाही.