काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत खळबळजनक आरोप केले. भाजपने महाराष्ट्र विधानसभा मॅच- फिक्सिंग करून जिंकली. तसेच भाजपने लोकशाही कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचले, असे आरोप राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने २८८ पैकी २३५ जागा जिंकल्या. यापैकी एकट्या भाजपने १३२ जागा जिंकल्या, जी त्यांची महाराष्ट्र विधानसभेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर, त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीला फक्त ५० जागेवर विजय मिळवता आला. हा निकाल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता.
"ही किरकोळ फसवणूक नाही तर निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी हेराफेरी आहे. २०२३ मध्ये केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या निवडीत बदल केले, ज्यामध्ये आता मुख्य न्यायाधीशांच्या जागी एका केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यामुळे निवडणूक आयोगाला निष्पक्ष राहणे कठीण झाले", असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेल्या एका पोस्टमध्ये एनडीए सरकारवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आयोगाच्या निवड पथकात फेरफार करण्यात आला, मतदार यादीत बनावट नावे जोडण्यात आली, मतदानाचे आकडे जाणूनबुजून वाढवून सांगण्यात आले, भाजपला जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी बनावट मते तयार करण्यात आली आणि पुरावे लपवण्यात आले, अशा पद्धतीने एनडीएने निवडणूक जिंकली, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजपचा पलटवारराहुल गांधींच्या या आरोपांवर भाजपने प्रत्युत्तर दिले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनी राहुल गांधीचे आरोप लज्जास्पद असल्याचे म्हटले."राहुल गांधी पुन्हा एकदा देशातील संस्थांबद्दल वाईट बोलत आहेत. निवडणूक आयोगाने या गोष्टी अनेक वेळा स्पष्ट केल्या आहेत", असे सिन्हा म्हणाले.