राघव चड्डांना आम आदमी पार्टीने तीन कारणांमुळे केले बाजूला, उपनेते पदावरून हटवण्यासारखं आता काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:38 IST2026-04-02T15:36:59+5:302026-04-02T15:38:12+5:30
Raghav Chadha: खासदार राघव चड्डा यांना आम आदमी पक्षाने राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवले. या निर्णयाने आम आदमी पक्षातील सुरू झालेल्या नव्या राजकारणाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राघव चड्डांना आम आदमी पार्टीने तीन कारणांमुळे केले बाजूला, उपनेते पदावरून हटवण्यासारखं आता काय घडलं?
Raghav Chadha Suspended: सर्वसामान्यांशी निगडित वेगवेगळे विषय संसदेत मांडणारे खासदार राघव चड्डा यांच्याबद्दल आम आदमी पक्षाने मोठा निर्णय घेतला. राज्यसभेत पक्षाचे उपनेते असलेल्या राघव चड्डा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. चड्डा यांना हटवण्यामागे गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांचे कारण असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्याच दिवशी आपने हा निर्णय घेतला आहे. इतकेच नाहीतर राघव चड्डा यांना वेळ दिला जाऊ नये असेही राज्यसभा सचिवालयाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. एकीकडे गुजरात निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केलेले असताना आपने अचानक राघव चड्डा यांना पदावरून का हटवले, यामागे तीन कारणे राजकीय वर्तुळात बोलली जात आहेत.
आपने राघव चड्डा यांना हटवून अशोक मित्तल यांची पक्षाचे राज्यसभेतील उपनेते म्हणून नियुक्ती केली आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर राघव चड्डा यांचे मौन
पहिली गोष्ट जी या कारवाईनंतर चर्चिली जात आहे, ती म्हणजे राघव चड्डा यांनी धरलेलं मौन. काही दिवसांपूर्वी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी मंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह इतर नेत्यांची न्यायालयाने मद्य धोरण घोटाळ्यात निर्दोष मुक्तता केली. पण, इतक्या मोठ्या निकालानंतरही राघव चड्डा काही बोलले नाही.
राघव चड्डा राज्यसभेत वेगवेगळे मुद्दे मांडत होते. पण, त्यासाठी ते जास्त वेळ घ्यायचे. प्रत्येक पक्षाला वेळ ठरवून दिलेला असतो. राघव चड्डा जास्त वेळ बोलत असल्याने पक्षाच्या इतर खासदारांना वेळ मिळत नसल्याचीही तक्रार आहे.
पक्षाच्या कामांपासून दूर, सत्ताधाऱ्यांवर टीका नाही
माजी आमदार असलेले राघव चड्डा २०२२ पासून राज्यसभा खासदार आहेत. पण, गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षाच्या कामापासून दूर आहेत. पक्ष वाढीच्या कामात ते फारसा रस घेत नसल्याची तक्रारही आहे. त्याचबरोबर राघव चड्डा वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत असले, तरी पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कारवाया झाल्या तरी त्यांनी त्यावर बोलणे टाळलेले आहे.
सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जाईल अशी कोणतीही भूमिका ते घेताना दिसत नसल्याचीही कूरबूर पक्षात आहे. त्यातच ते पक्षांतर करणार असल्याच्याही चर्चा मध्ये सुरू झाल्या होत्या. पण, त्याचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपणार असल्याने ते पक्षांतर करण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.