Punjab Floods: गेल्या महिन्याभरापासून पंजाबवर आस्मानी संकटाचा सामना करत आहे. राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि रावी, सतलज, व्यास नद्यांचा रौद्रवतार यामुळे अर्धे पंजाब पाण्यात बुडाले आहे. १३०० गावांना पुराने वेढा दिला असून, पाऊस आणि पुरामुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक घरंदार सोडून सुरक्षित स्थळी गेले आहेत.
पंजाबमध्ये महापुरामुळे हाहाकार उडाला असून, पिकं पूर्ण पाण्यात सडली आहेत. घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी मदत शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.
अमृतसरला सर्वाधिक फटका
पाऊस आणि पुराचा अमृतसर जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. ३५ हजार लोक बेघर झाले आहेत. त्यापाठोपाठ फिरोजपूर जिल्ह्यातही २४ हजार १५ लोकांना घर सोडून मदत शिबिरात जावं लागलं आहे. फाजिल्कामध्ये २१५६२, पठाणकोटमध्ये १५०५३, गुरुदासपूरमध्ये १४५००, होशियारपूरमध्ये ११५२, एसएएस नगरमध्ये ७०००, कपूरथलामध्ये ५६५०, मोगामध्ये ८००, जालंधरमध्ये ६५३, मानसामध्ये १६३ तर बरनालामध्ये ५९ लोकांना पुराचा फटका बसला आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती लोकांचा मृत्यू?
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे सर्वाधिक ६ बळी पठाणकोट जिल्ह्यात गेले आहेत. त्यापाठोपाठ अमृतसर, बरनाला, होशियारपूर, लुधियाना, मानसा आणि रुपनगर जिल्ह्यात प्रत्येकी ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यातही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पठाणकोटमध्ये ३ लोक बेपत्ता आहेत.
१३०० गावांना पुराचा फटका
अर्ध्या पंजाबला महापुराचा फटका बसला आहे. पंजाबमधील १३०० गावांना पुराने वेढले असून, गुरूदासपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३२१ गावांना पुराने वेढले आहे. अमृतसरमध्ये ८८, बरनालामध्ये २४, फाजिल्कामध्ये ७२, फिरोजपूरमध्ये ७६, होशियारपूरमध्ये ९४, जालंधरमध्ये ५५, कपूरथलामध्ये ११५, मानसामध्ये ७७, मोगामध्ये ३९, पठाणकोटमध्ये ८२ यासह इतर जिल्ह्यातील गावांचाही यात समावेश आहे. पुरामुळे २ लाख ५६ हजार लोक विस्थापित झाले आहेत.
पुरामुळे चंदीगढ आणि पंजाबमधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. ३ सप्टेंबरपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.