PM Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; पंतप्रधान मोदींची शहीद जवानांसाठी भावूक पोस्ट, काय लिहिलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 10:37 IST2026-02-14T10:35:59+5:302026-02-14T10:37:04+5:30
Pulwama Terror Attack: १४ फेब्रुवारी २०१९...तो दिवस आणि आपल्या ४० जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही. आज या घटनेला ६ वर्षे पूर्ण होत असताना, संपूर्ण देश आपल्या शूर सुपुत्रांच्या स्मृतींना उजाळा देत आहे.

PM Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; पंतप्रधान मोदींची शहीद जवानांसाठी भावूक पोस्ट, काय लिहिलं?
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना आज संपूर्ण देशाने अभिवादन केले. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जवानांच्या अदम्य साहसाचा गौरव केला. त्यांनी लिहिले की, "२०१९ मध्ये आजच्या दिवशी पुलवामामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीरांचे स्मरण करताना, त्यांची भक्ती, दृढनिश्चय आणि देशसेवा नेहमीच आपल्या मनात राहील. प्रत्येक भारतीय त्यांच्या धाडसातून शक्ती मिळवतो. जवानांच्या या त्यागामुळेच देश सुरक्षित असून त्यांचे शौर्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील", अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
Remembering the brave heroes who laid down their lives in Pulwama on this day in 2019. Their devotion, resolve and service to the nation remain forever etched in our collective consciousness. Every Indian draws strength from their enduring courage.
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2026
उपराष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
उपराष्ट्रपतींनी देखील या प्रसंगी जवानांच्या सर्वोच्च त्यागाचा गौरव केला. ते म्हणाले, "पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर सैनिकांना मी श्रद्धांजली वाहतो. त्यांचे सर्वोच्च बलिदान देशाच्या स्मृतीत नेहमीच कोरले जाईल आणि एक मजबूत आणि सुरक्षित भारत निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहील."
'तो'काळा दिवस!
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन आदळले. या भीषण हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने अवघ्या काही दिवसांतच पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करून शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले.