पूज्य मोरारी बापू यांच्या हस्ते रामकथेवर आधारित 'राम रसायन'चे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:15 IST2026-01-23T09:14:44+5:302026-01-23T09:15:06+5:30
बापूंची १००० वी कथा नागपुरात व्हावी : डॉ. विजय दर्डा

पूज्य मोरारी बापू यांच्या हस्ते रामकथेवर आधारित 'राम रसायन'चे प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जागतिक ख्यातीचे संत पूज्य मोरारी बापू यांच्या रामकथेवर आधारित 'राम रसायन' या कॉफी टेबल बुकचे विमोचन गुरुवारी दिल्ली येथे भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि एडिटर—इन—चीफ राजेंद्र दर्डा यांनी यवतमाळ येथे पूज्य मोरारी बापू यांची रामकथा आयोजित केली होती. यावर हे कॉफी टेबल बुक आधारित आहे. या प्रसंगी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याच्या राज्यमंत्री निमूबेन बंभानिया, अहिंसा विश्व भारती आणि विश्व शांती केंद्राचे संस्थापक जैन आचार्य मुनी लोकेश सनातनी, डॉ. विजय दर्डा, माजी आमदार कीर्ती गांधी, इस्कॉन ग्रुपचे चेअरमन आणि गुजरात पवित्र यात्राधाम विकास बोर्डाचे माजी अध्यक्ष प्रवीणचंद्र कोटक, यवतमाळचे निवासी आयआरएस सोहेल अंसारी, मुंबईचे विकास कनोई आणि वीर चक्र प्राप्त कर्नल (निवृत्त) तजेंद्रपाल त्यागी आदी मान्यवर उपस्थित होते.
अहिंसा विश्व भारती आणि विश्व शांती केंद्राचे संस्थापक जैन आचार्य लोकेश मुनी सनातनी यांनी दिल्लीच्या भारत मंडपम येथे पूज्य मोरारी बापू यांची नऊ दिवसीय रामकथा आयोजित केली आहे. रामकथेचा सहावा दिवस होता.
‘राम रसायन’ कॉफी टेबल बुकमध्ये भगवान रामाचे जीवन, तत्त्वज्ञान व ‘रामचरितमानस’चा गहन अर्थ आधुनिक व कलात्मक पद्धतीने सादर केला आहे. रामायणातील विविध प्रसंग, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची जीवनमूल्ये आणि पूज्य मोरारी बापू यांच्या कथेतील मुख्य अंशाचा समावेश आहे.
यवतमाळ येथे संपन्न झालेल्या रामकथेवर आधारित "राम रसायन" या कॉफी टेबल बुकचे विमोचन प्रसिद्ध रामकथाकार पूज्य मोरारी बापू यांच्या हस्ते गुरुवारी दिल्लीतील भारत मंडपम येथे झाले. याप्रसंगी अहिंसा विश्व भारती आणि विश्व शांती केंद्राचे संस्थापक जैन आचार्य लोकेश मुनी सनातनी, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, इस्कॉन ग्रुपचे चेअरमन आणि गुजरात पवित्र यात्राधाम विकास बोर्डचे माजी चेअरमन प्रवीणचंद्र कोटक आणि माजी आमदार कीर्ती गांधी उपस्थित होते.
'राम रसायन' कॉफी टेबल बुकचे विमोचन करताना पूज्य मोरारी बापू म्हणाले की, स्वतंत्रता संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उर्फ बाबूजी यांचे चिरंजीव डॉ. विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची ईश्वरचरणी असलेली श्रद्धा आणि भाव कौतुकास्पद आहे. यवतमाळ येथे सप्टेंबरमध्ये झालेली रामकथा विविध गोष्टींमुळे महत्त्वाची होती. दर्डा कुटुंब १ निमित्त ठरले. परंतु, रामकथेचा प्रसाद सर्व यवतमाळवासीयांना मिळाला.
यजमान कवी असेल तर मला आनंद होतो
पूज्य बापू म्हणाले की, डॉ. विजय दर्डा रामकथेत दररोज आपले विचार प्रस्तुत करीत होते. त्यांच्या उद्बोधनात उत्साह वाढविणारी शेरो-शायरी आणि भावनात्मक कविता असायच्या. यात त्यांची स्वत:ची रचना सुध्दा होती. माझा यजमान कवी असेल तर मला खूप आनंद होतो, असेही ते म्हणाले आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
यवतमाळ येथे पूज्य मोरारी बापू यांची रामकथा व्हावी अशी डॉ. विजय दर्डा यांची मनापासून इच्छा होती. ते जैन धर्माचे सुश्रावक आहेत आणि महान स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डाजी यांचे सुपुत्र आहेत, असे जैन आचार्य लोकेश मुनी सनातनी म्हणाले.
बापूंची १००० वी कथा नागपुरात व्हावी : डॉ. विजय दर्डा
'राम रसायन'च्या विमोचनाप्रसंगी बोलताना डॉ. विजय दर्डा यांनी पूज्य मोरारी बापू यांची १००० वी कथा भारताचे हृदयस्थान नागपुरात व्हावी अशी विनंती केली. समाजात विवेकहीनता वाढत आहे. नात्यांमध्ये औपचारिकता आली आहे. संकुचित भावना वाढत चालल्या आहेत. मानवीय मूल्ये कमी होत चालले आहे. अशा परिस्थितीत रामाचे नाव शक्तीचा स्रोत आहे.
बापूजींच्या रामकथेत राम मानवी रूपात आहे. प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. प्रतिकूल परिस्थितीत संयम राखणारा आणि पराभूत झाल्यानंतरही नम्रपणा बाळगणारा आहे. 'राम रसायन' हा शब्द हनुमान चालिसातील "राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा" या ओळीतून घेण्यात आला असल्याचे डॉ. दर्डा म्हणाले. 'रसायन' म्हणजे जीवनातील दुःख दूर करणारे व आनंद प्रदान करणारे अमृत.
२००२ मध्ये माझी आई वीणा देवी दर्डा आणि बाबूजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणेने यवतमाळमध्ये पूज्य आदरणीय रमेश भाई ओझा यांची भागवत कथा झाली होती. तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांचे आगमन झाले होते आणि प्रेरणा देऊन गेले होते. माझ्या आईची इच्छा होती की हा आध्यात्मिक आनंद 'रामकथे'च्या रूपात सर्वांना मिळावा. माझी पत्नी ज्योत्स्ना दर्डा यांची सुद्धा हीच इच्छा होती. धार्मिक सलोखा आणि मानवी मूल्यांच्या पुन:स्थापनेचा रामकथा हा एकमेव मार्ग असल्याचेही डॉ. विजय दर्डा यावेळी म्हणाले.
डॉ. विजय दर्डा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भाजपचे खासदार मनोज तिवारी यांना 'राम रसायन' कॉफी टेबल बुकची प्रत भेट देण्यात आली. याप्रसंगी त्यांनी एक शेर सादर करीत पूज्य बापूजींच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले,
मजहब बेनाम हो जाये तो सुकून मिले
हर खुदा में हैं, खुदा हर में हैं
ये बात आम हो जाये तो सुकून मिले
नजर का उठना, कुछ कहना लाजिम हैं
हर नजर पाक हो जाये तो सुकून मिले
सूरज, आसमान, तारे-चांद, नदियां-नाले सब सबके साझे हैं
इंसान भी इंसान का हो जाये तो सुकून मिले...