आरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा! 'देश विकल्या'च्या आरोपावर राहुल गांधींना रिजिजूंनी दिली ५ वाजेपर्यंतची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:34 IST2026-02-11T16:33:32+5:302026-02-11T16:34:09+5:30
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केला.

आरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा! 'देश विकल्या'च्या आरोपावर राहुल गांधींना रिजिजूंनी दिली ५ वाजेपर्यंतची वेळ
Kiren Rijiju Attack on Rahul Gandhi:संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज भारत-अमेरिका व्यापार करारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अभूतपूर्व खडाजंगी पाहायला मिळाली. "सरकारने भारताला अमेरिकेच्या दावणीला बांधले असून भारत माता विकली आहे," अशा शब्दांत राहुल गांधींनी हल्लाबोल केला. यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू प्रचंड संतापले आणि त्यांनी राहुल गांधींना थेट आव्हान देत प्रतिहल्ला चढवला.
राहुल गांधींचा भारत माता विकल्याचा आरोप
लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या नव्या व्यापारी करारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. "हा करार म्हणजे भारताने शरणागती पत्करल्या सारखे आहे. पंतप्रधान मोदींनी देशाचा डेटा आणि शेतकऱ्यांचे हित अमेरिकेच्या घशात घातले आहे. भारत मातेला विकताना तुम्हाला लाज वाटत नाही का?" असा बोचरा सवाल राहुल गांधींनी केला. तसेच, अमेरिकन डॉलरला वाचवण्यासाठी भारतीयांचा डेटा वापरला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
किरण रिजिजूंचे प्रत्युत्तर
राहुल गांधींचे भाषण सुरू असतानाच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपल्या जागेवर उभे राहिले आणि त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. रिजिजू म्हणाले, "या देशाला विकू शकेल किंवा विकत घेऊ शकेल असा कोणताही माई का लाल अद्याप जन्माला आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे आतापर्यंतचे सर्वात कणखर पंतप्रधान आहेत. राहुल गांधी विनापुरावा आणि बिनबुडाचे आरोप करून सदन दिशाभूल करत आहेत, हे खपवून घेतले जाणार नाही."
"आरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा!"
रिजिजू यांनी राहुल गांधींच्या गंभीर आरोपांवरून त्यांना घेरले. "तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, तुमच्या शब्दांना वजन आहे. तुम्ही जे आरोप केले आहेत, ते तुम्हाला सभागृहात सिद्ध करावे लागतील. राहुल गांधी केवळ खोटे बोलून पळ काढतात, ते मंत्र्यांचे उत्तर ऐकायलाही थांबत नाहीत," अशी टीका रिजिजू यांनी केली.
विशेषाधिकार हनन नोटीसचा इशारा
किरेन रिजिजू यांनी जाहीर केले की, जर राहुल गांधींनी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या विधानाबद्दल माफी मागितली नाही किंवा आरोप सिद्ध केले नाहीत, तर सरकार त्यांच्या विरोधात विशेषाधिकार हनन प्रस्ताव आणणार आहे. "सभागृहाचे नियम स्पष्ट आहेत, कोणत्याही सदस्यावर आरोप करण्यापूर्वी नोटीस द्यावी लागते आणि पुरावे सादर करावे लागतात. राहुल गांधींनी आज केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावरही विनानोटीस आरोप केले आहेत," असे रिजिजू म्हणाले.