पंतप्रधान मोदींकडून इंधन-ऊर्जा पुरवठ्याचा आढावा; समुद्रमार्गे १६ हजार टन एलपीजी दाखल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 06:37 IST2026-03-23T06:36:23+5:302026-03-23T06:37:12+5:30
देशभरात अखंड पुरवठा आणि कार्यक्षम वितरण सुनिश्चित करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींकडून इंधन-ऊर्जा पुरवठ्याचा आढावा; समुद्रमार्गे १६ हजार टन एलपीजी दाखल!
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कच्चे तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम उत्पादने तसेच ऊर्जा आणि खत क्षेत्रातील पुरवठा स्थितीविषयी वरिष्ठ मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. देशभरात अखंड पुरवठा आणि कार्यक्षम वितरण सुनिश्चित करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
बैठकीत कच्चे तेल, वायू, पेट्रोलियम उत्पादने, ग्राहक आणि उद्योग क्षेत्राच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.
भारतीय खलाशी सुरक्षित
संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्शियाच्या आखातात अडकलेली सर्व भारतीय जहाजे आणि खलाशी सुरक्षित असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. केंद्रीय बंदरे व जहाज बांधणी मंत्रालयाने गेल्या २४ तासांत कोणतीही सागरी दुर्घटना नोंदलेली नाही. आखातातील २२ भारतीय जहाजे व ६११ भारतीय खलाशी सुरक्षित असून, त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे, असे म्हटले आहे.
समुद्रमार्गे आली १६ हजार टन ऊर्जा! एलपीजी दाखल
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यात निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतून स्वयंपाकाचा गॅस घेऊन एक जहाज रविवारी न्यू मंगळुरू बंदरात दाखल झाले. देशातील ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने ही घडामोडी घटना आहे.
‘पिक्सिस पायोनियर’ हे जहाज १४ फेब्रुवारी रोजी टेक्सासमधील पोर्ट ऑफ निदरलँड येथून निघाले होते. या जहाजातून सुमारे १६,७१४ टन एलपीजी आणण्यात आले असून ते एजिस लॉजिस्टिक्सकडे उतरवण्यात येणार आहे. हे जहाज बंदरात पोहोचलेल्या रशियन ‘एक्वा टायटन’ जहाजानंतर आले आहे. यापूर्वी चीनकडे जात असलेले हे रशियन कच्चे तेलवाहू जहाज भारताकडे वळवले होते. शनिवारी मंगळुरू किनाऱ्याजवळ पोहोचलेल्या या जहाजात सुमारे ७.७ लाख बॅरल कच्चे तेल असल्याचे सांगण्यात आले.