"पंतप्रधान मोदी ती चूक कधीच सुधारू शकणार नाहीत"; परराष्ट्र धोरणांवरून राहुल गांधींची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:02 IST2026-03-24T15:44:22+5:302026-03-24T16:02:27+5:30
सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली.

"पंतप्रधान मोदी ती चूक कधीच सुधारू शकणार नाहीत"; परराष्ट्र धोरणांवरून राहुल गांधींची सरकारवर टीका
Rahul Gandhi on PM Modi: पश्चिम आशियातील युद्धाचे ढग गडद होत असतानाच आता भारतीय राजकारणात परराष्ट्र धोरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. "अमेरिका आणि इस्रायल सांगेल तेच पंतप्रधान मोदी करतील," अशा शब्दांत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.
पश्चिम आशियातील संकट, इंधनाचा तुटवडा आणि मानवी हक्कांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने बुधवारी संध्याकाळी ५ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र, राहुल गांधींनी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.
"माझा केरळमध्ये आधीच कार्यक्रम ठरलेला असल्याने मी या बैठकीला येऊ शकणार नाही. "सर्वपक्षीय बैठक व्हायला हवी, हे खरं आहे पण या संपूर्ण प्रक्रियेत एक मोठी रचनात्मक चूक झाली आहे. कारण ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे, त्याचा पायाच चुकीचा आहे आणि ही चूक सुधारली जाऊ शकत नाही, विशेषतः पंतप्रधान मोदी तर ती अजिबात सुधारू शकत नाहीत," असे राहुल गांधी म्हणाले.
भारत नव्हे, अमेरिका-इस्रायलचे हित
"पंतप्रधान मोदी तेच करतील जे अमेरिका, इस्रायला सांगेल. ते भारतीय शेतकरी आणि देशाच्या हितासाठी काम करणार नाहीत. अमेरिका आणि इस्रायल जे आदेश देतील, त्याचेच पालन मोदी सरकारकडून केले जात आहे. काल संसदेत त्यांनी केलेले भाषण अत्यंत हास्यास्पद होते," असा टोला राहुल यांनी लगावला.
जनतेला भोगावे लागणार परिणाम
देशातील वाढत्या महागाईवर बोट ठेवत राहुल गांधींनी इशारा दिला की, सरकारच्या या चुकीच्या धोरणांचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती ही तर फक्त सुरुवात आहे. पंतप्रधान या परिस्थितीची तुलना कोविडशी करत आहेत, पण कोविडमध्ये किती लोकांचा बळी गेला, हे ते सोयीस्करपणे विसरले आहेत.
अमेरिका आणि इस्रायल जे सांगतील, पंतप्रधान मोदी तेच करतील
"आपले परराष्ट्र धोरण आता देशाचे राहिले नसून ती पंतप्रधान मोदींची वैयक्तिक पॉलिसी बनली आहे. आता हे धोरण म्हणजे संपूर्ण जगासाठी एक जागतिक विनोद बनला आहे. जर आमचे पंतप्रधानच दबावाखाली असतील, तर देशाचे परराष्ट्र धोरणही दबावाखालीच राहणार. आपली नेमकी भूमिका काय आहे? आपली कोणतीही ठाम भूमिका नाही आणि याचा फटका सामान्य जनतेला सहन करावा लागेल. ही तर फक्त सुरुवात आहे, आता सर्वच गोष्टींमध्ये अडचणी येतील," असेही राहुल गांधी म्हणाले.