"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:15 IST2025-05-06T15:57:58+5:302025-05-06T16:15:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रद्द झालेल्या काश्मीर दौऱ्यावरुन काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठा दावा केला आहे.

"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Mallikarjun Kharge on PM Narendra Modi Kashmir Visit: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना पाकिस्तानातून पाठिंबा मिळत असल्याने भारताने शेजारील देशाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. दुसरीकडे, या दहशतवादी हल्ल्यावरुन आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ल्याबद्दल गुप्तचर अहवाल देण्यात आला होता असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी केला. या अहवालानंतरच पंतप्रधान मोदींचा काश्मीर दौरा रद्द करण्यात आला, असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
पहलगाम हल्ल्यावरुन विरोधकांनी सरकारला पूर्णपणे सहकार्य करत पाठिंबा जाहीर केला. दहशतवाद्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या गुप्तचर अहवालाच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काश्मीर दौरा रद्द करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. दहशतवादी हल्ल्याचे गुप्तचर अहवाल असूनही केंद्राने पहलगाममध्ये अधिक सुरक्षा कर्मचारी का तैनात केले नाहीत? असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी रांची येथील एका कार्यक्रमात उपस्थित केला.
"पहलगाम हल्ला गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे सरकारने ते मान्य केले आहे. जर त्यांना हे माहित होते तर त्यांनी काहीही का केले नाही? हल्ल्याच्या ३ दिवस आधी पंतप्रधान मोदींना गुप्तचर अहवाल पाठवण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांनी काश्मीरला भेट देण्याचा त्यांचा कार्यक्रम रद्द केला होता, अशी माहिती मला मिळाली आहे, हे मी एका वर्तमानपत्रातही वाचले होते," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
"गुप्तचर यंत्रणेने तुमच्या सुरक्षेसाठी सांगितले होते की तिथे जाणे योग्य नाही, तेव्हा तुम्ही सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी तेथील सीमा दल आणि पोलिसांना हे का सांगितले नाही? दहशतवादी हल्ल्याचे गुप्तचर अहवाल असूनही केंद्राने पहलगाममध्ये अधिक सुरक्षा कर्मचारी का तैनात केले नाहीत? जेव्हा केंद्राने गुप्तचर यंत्रणेतील अपयश मान्य केले आहे, तेव्हा पहलगाम हल्ल्यातील लोकांच्या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरले जाऊ नये का?," असही सवाल खरगेंनी केला.