देशाभिमान अन् सांस्कृतिक अभिमानाला महत्त्व असू द्या, राष्ट्रपतींचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रतिपादन; विरोधकांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 05:43 IST2026-01-29T05:43:23+5:302026-01-29T05:43:55+5:30
Parliament Budget Session: वसाहतवादाच्या काळात मॅकॉलेच्या कारस्थानांद्वारे भारतीय जनतेमध्ये हीनतेची भावना रुजवण्यात आली होती आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्र सरकारने यावर प्रहार करण्याचे धाडस दाखवले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी केले.

देशाभिमान अन् सांस्कृतिक अभिमानाला महत्त्व असू द्या, राष्ट्रपतींचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रतिपादन; विरोधकांची टीका
नवी दिल्ली - वसाहतवादाच्या काळात मॅकॉलेच्या कारस्थानांद्वारे भारतीय जनतेमध्ये हीनतेची भावना रुजवण्यात आली होती आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्र सरकारने यावर प्रहार करण्याचे धाडस दाखवले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना मुर्मू म्हणाल्या की, विकसित भारत हे ध्येय गाठण्यासाठी आधुनिक विकासासोबतच राष्ट्रीय स्वाभिमान आणि सांस्कृतिक अभिमानाला महत्त्व देणे आवश्यक आहे.
अभिभाषण नीरस, पोकळ
राष्ट्रपतींचे केंद्र सरकारने तयार केलेले भाषण नीरस आणि पोकळ आश्वासनांनी भरलेले असल्याची टीका काँग्रेसने केली. यात काहीही नवीन नव्हते, अशी टिप्पणीही केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- सरकारी प्रयत्नांमुळे भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष १२५ वर्षांनंतर भारतात परत आले.
- २०२६ हे वर्ष सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे प्रतीक.
- प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशनचे काम सुरू.
- 'विकसित भारत', सुरक्षा आणि 'स्वदेशी' या विषयांवर सर्व खासदारांनी एकत्र उभे राहावे.
- युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत दिवाळीचा समावेश अभिमानास्पद.
-लोकशाहीत मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु राष्ट्राच्या बाबतीत सर्वांचे एकमत हवे.
- म. गांधी, पं. नेहरु, डॉ. आंबेडकर, सरदार पटेल, वाजपेयी यांचे कार्य अतुलनीय.
- विकसित भारत हे ध्येय सरकार वा पिढीपुरते सीमित नाही तर तो निरंतर प्रवास.