अपघातात मुलाचा जीव गेला; आई-वडिलांनी खड्डे बुजविण्याचा वसाच घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:01 IST2020-02-11T11:59:05+5:302020-02-11T12:01:27+5:30
रस्त्यावर पडत असलेल्या खड्ड्यांमधल्या अपघातात अनेक आईवडिलांनी आपल्या तरुण मुलांना गमावलं आहे.

अपघातात मुलाचा जीव गेला; आई-वडिलांनी खड्डे बुजविण्याचा वसाच घेतला
नवी दिल्लीः रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण वाचल्याच असतील. रस्त्यावर पडत असलेल्या खड्ड्यांमधल्या अपघातात अनेक आईवडिलांनी आपल्या तरुण मुलांना गमावलं आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुलाला गमावलेल्या आईवडिलांनी एक अनोखंच अभियान सुरू केलं आहे. रस्ते अपघातात आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मनोज वाधवा यांनी दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचं अनोखं अभियान सुरू केलं आहे.
नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय राजमार्गावर बाटा चौकजवळच्या रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे सहा वर्षांपूर्वी 10 फेब्रुवारी 2014ला मनोज वाधवा यांनी आपल्या तीन वर्षांचा मुलगा पवित्रला गमावलं. या अपघातप्रकरणी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दोषी धरलेलं असून, त्यांच्याविरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत. सोमवरी मनोज आणि त्यांची पत्नी टीना त्याच बाटा चौक या ठिकाणी पोहोचले जिथे त्यांनी आपल्या मुलाला गमावलं होतं. मनोज आणि त्यांची पत्नी रस्त्यांच्या कडेवरचे खड्डे भरताना दिसत आहेत.
मनोज वाधवा हे 10 फेब्रुवारी 2014ला पत्नी टीना आणि 3 वर्षांचा मुलगा पवित्रबरोबर स्कूटरवरून बाटा रस्त्यावर आले असता त्याचदरम्यान पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात त्यांची स्कूटर गेली अन् त्यांचा स्कूटरवरील ताबा सुटला. या दुर्घटनेत मुलगा पवित्रला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावर पडलेल्या टीना यांच्या पायावरूनही एक अज्ञात वाहन गेलं. तसेच या अपघातात मुलगा पवित्रचा मृत्यू झाला. तसेच पत्नी टीना हिचे आतापर्यंत 23 ऑपरेशन झाले आहेत. मनोज वाधवा यांनी सांगितलं की, रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांना महापालिका, राजमार्ग प्राधिकरण, हरियाणा शहर विकास प्राधिकरणाच्या अधिकारी जबाबदार आहेत.