Bengaluru Stampede : “मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:05 IST2025-06-05T13:05:05+5:302025-06-05T13:05:49+5:30
Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत जीव गमावलेला महाविद्यालयीन विद्यार्थी मनोज कुमारच्या वडिलांनी आपलं दु:ख व्यक्त केलं.

Bengaluru Stampede : “मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू
आयपीएल विजेत्या आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान उद्भवलेल्या चेंगराचेंगरीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याच दरम्यान मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चेंगराचेंगरीत जीव गमावलेला महाविद्यालयीन विद्यार्थी मनोज कुमारच्या वडिलांनी आपलं दु:ख व्यक्त केलं. मनोज कुमारचे वडील पाणीपुरीचा व्यवसाय करतात.
"मी मनोजला दुकानात पाणीपुरीची एकही प्लेट कधी धुवू दिली नाही कारण मला वाटायचं त्याने कॉलेजमध्ये जावं आणि खूप शिकावं. मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं होतं, आता तो सोडून गेला" असं मनोजच्या वडिलांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं आहे. १८ वर्षीय मनोज कुमार बंगळुरूमधील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये फर्स्ट इअरला होता. मनोज शेजारी राहणाऱ्या त्याच्या तीन मित्रांसह आरसीबीच्या विजयाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गेला होता.
"काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं?
मुलाच्या मृत्यूसाठी मित्रांना धरलं जबाबदार
मनोजचा मित्र सात्विकही तिथे उपस्थित होता. त्याने सांगितलं की, मनोजनेच स्टेडियममध्ये जाण्यास सांगितलं होतं. मात्र मनोज कुमारच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी त्याच्या मित्रांना जबाबदार धरलं आहे. तुम्ही लोकांनी त्याला स्टेडियममध्ये जाण्यास भाग पाडलं असं ते म्हणाले. मित्रांनी सांगितलं की, मोहम्मद हुसेन या व्यक्तीने मनोजला रुग्णालयात नेण्यास मदत केली. हुसेनकडे मनोजचा मोबाईल होता.
"मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो
चेंगराचेंगरीत एका व्यक्तीने आपला एकुलता एक मुलगा गमावला. लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी टाहो फोडला. पोस्टमॉर्टम न करता मुलाचा मृतदेह द्या अशी कळकळीची विनंती ते आता करत आहेत. मी मुलगा गमावला आहे. आता त्याच्या मृतदेहाचे तुकडे करू नका असं ते सतत म्हणत आहेत. त्यांचं हे दु:ख पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.