“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:26 IST2025-04-26T13:25:18+5:302025-04-26T13:26:47+5:30
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानातील ९ आणि ७ वर्षांची लहान मुले जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त आहेत. भारतातील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे नवी दिल्लीत उपचार शक्य झाले. पुढील आठवड्यात त्यांची शस्त्रक्रिया आहे.

“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतानेपाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून ४८ तासांत मायदेशी निघून जावे, असा आदेश देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन करून एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, याची खातरजमा करण्यास सांगितले. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. परंतु, यातच भारतात उपचारासाठी आलेल्या दोन लहान मुलांच्या पालकांनी किमान उपचार होईपर्यंत आम्हाला राहू द्यावे, अशी कळकळीची विनंती सरकारला केली आहे.
केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी, अशी सूचना अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. तसेच पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी शक्य तितक्या लवकर मायदेशी परतावे असेही सांगितले. परंतु, आपल्या दोन मुलांसाठी वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्या एका पाकिस्तानी व्यक्तीने दोन्ही सरकारांना भारतात अधिक वेळ राहू देण्याची परवानगी मागितली आहे.
भारत सोडण्याचे आदेश दिल्याने या पाकिस्तानी नागरिकाची अडचण
पहलगामच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिल्याने या पाकिस्तानी नागरिकाची अडचण निर्माण झाली आहे. सिंधमधील हैदराबाद येथील हे कुटुंब आहे. मुळचे पाकिस्तानी असलेल्या दोन मुलांच्या वडिलांनी काही मीडियाशी बोलताना सांगितले की, त्यांची ९ आणि ७ वर्षांची मुले जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त आहेत. त्यांना हृदयविकार आहे आणि येथील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्यावर नवी दिल्लीत उपचार शक्य झाले. पुढील आठवड्यात त्यांची शस्त्रक्रिया होणार आहे. परंतु पहलगाम घटनेनंतर ताबडतोब पाकिस्तानला परतण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी माझ्या मुलांचे वैद्यकीय उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. कारण आम्ही आमच्या प्रवासावर, राहण्यासाठी आणि त्यांच्या उपचारांवर सुमारे १ कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी विनंती करण्यात आली आहे. रुग्णालय आणि डॉक्टर कुटुंबाला सहकार्य करत आहेत, परंतु पोलीस आणि परराष्ट्र कार्यालयाने त्यांना तातडीने दिल्ली सोडण्यास सांगितले आहे, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.