पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:47 IST2025-05-06T18:47:04+5:302025-05-06T18:47:36+5:30
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमधून पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सातत्याने पाकिस्तानवर टीका करताना दिसत आहेत. अशातच, ओवेसी मंगळवारी(6 मे) काश्मीरमध्ये पोहोचले. यादरम्यान, त्यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केले अन् केंद्र सरकारने पाकिस्तानला सर्वात मोठी अद्दल घडवण्याची मागणीही केली.
पाकिस्तानला धडा शिकवा
हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना ओवेसी म्हणाले, पहलगाममध्ये लोकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या घालण्यात आल्या. या गुन्हेगारांना माणूस म्हणवून घेण्याचे अधिकार नाहीत. आम्ही सरकारला या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावामुळे आपल्याला कारवाई करण्याचा अधिकार मिळतो. पाकिस्तानी सैन्य दोन्ही देशांमधील संबंध बिघडवत आहे. वातावरण बिघडवणे ही पाकिस्तानी सैन्याची सवय आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत असे पाकिस्तानी लष्कराला वाटत नाही. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. भारताने अशी कारवाई करावी जेणेकरून कोणीही पुन्हा असे करू नये. उत्तर असे असले पाहिजे की, पाकिस्तानने 100 वेळा विचार करावा.
आज कश्मीर पहुंचकर पहलगाम हमले पर मीडिया से बातचीत कीpic.twitter.com/bWI3Kr2q3y
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 6, 2025
तुर्कीने सीरियामध्ये जे केले...
ओवेसी पुढे म्हणतात, यावेळी फक्त हल्ला करू नका, तिथे जाऊन बसा. भारताने पाकिस्तानच्या गैर-राज्य घटकांना शिक्षा करणे महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे तुर्कीने सीरियात घुसून राज्याबाहेरील घटकांवर हल्ला केला, त्याचप्रमाणे भारतानेही तेच करायला हवे. पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. पाकिस्तानमध्ये लष्कर इस्लामच्या नावाखाली लोकांना भडकावू शकत नाही. जर पाकिस्तान म्हणत असेल की, सिंधू पाणी कराराचे उल्लंघन करणे युद्ध आहे तर त्यांनी पहलगाममध्ये काय केले? आता भारत सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. मी सरकारच्या प्रत्येक निर्णयासोबत आहे. आता दहशतवाद थांबवायला हवा. आता पाकिस्तानने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.