मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:06 IST2025-05-09T12:03:10+5:302025-05-09T12:06:06+5:30
Operation Sindoor: अमेरिकेचा दबाव झुगारून तत्कालीन संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर आणि पंतप्रधान मोदी यांनी केलेले करार आज भारतीय सैन्यासाठी वरदान ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ९ ठिकाणी हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व सुमारे ५० ड्रोन भारताने पाडले. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. परंतु, यामध्ये सर्वांत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावली ती, S-400 सुदर्शन चक्राने. पाकिस्तानचा हल्ला रोखण्यासाठी भारताने एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केला. S-400 क्षेपणास्त्र प्रणाली भारताला मिळण्यासाठी तत्कालीन माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी दाखवलेली दूरदृष्टी आत्ता भारतीय सैन्यासाठी अतूट शक्ती ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला. यानंतर पाकने भारतावर हल्ले सुरू केले. यावेळी भारताची अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्र प्रणाली पूर्णपणे सक्रिय राहिली. ही S-400 क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय लष्कर आणि वायू दलासाठी एक मजबूत सुरक्षा कवच ठरत आहे. एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीने पाकिस्तानकडून हवेत सोडण्यात आलेले अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट केली. भारताकडे असलेली S-400 क्षेपणास्त्र प्रणाली ४०० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे लक्ष्य नष्ट करण्यास सक्षम आहे.
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती
एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचा करण्यात आलेला करार भारतासाठी आता वरदान ठरत आहे. कारण ही प्रणाली भारतीय वायू दलासाठी अभेद्य ताकद ठरत आहेत. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात याचा करार करण्यात आला होता. एस-४०० करार प्रत्यक्षात उतरवून भारताची ताकद वाढवण्यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले प्रयत्न या भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अचूक ठरताना पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानने डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन याच प्रणालीमुळे पाडण्यात आले.
दरम्यान, पाकिस्तानने सलग दोन रात्री भारतावर ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमानांनी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. शेकडो आत्मघाती ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमाने पाडण्यात भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या S-400 ची मोठी भूमिका राहिली आहे. ही डील झालीच नसती तर आज भारताचे प्रचंड नुकसान झाले असते. भारताने विकसित केलेल्या डिफेन्स सिस्टीमदेखील हा हल्ला परतवण्यासाठी वापरण्यात आल्या आहेत.