Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:39 IST2025-05-08T13:39:12+5:302025-05-08T13:39:35+5:30
Operation Sindoor : २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे.

Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
शुभम आणि ऐशन्या यांचं लग्न होऊन दोन महिनेही झाले नव्हते. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर करत चोख प्रत्युत्तर दिलं. लष्कराने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ऐशन्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. "ऑपरेशन सिंदूर हे आमच्या वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर आहे, ज्यामध्ये शुभम आणि माझ्यासारख्या इतर महिलांचे पती दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. आमचं कुंकू आता शौर्य आणि देशभक्तीचा संकल्प बनलं आहे" असं म्हटलं.
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांपैकी कानपूरचा शुभम हा एक होता. ऐशन्याच्या लग्नाला ६० दिवसही झाले नव्हते. "मला अभिमान आहे की, शुभमने देशासाठी आपलं बलिदान दिलं, पण माझं कुंकू हिरावून घेतलं. आता माझी प्रार्थना आहे की, इतर कोणत्याही महिलेला या वेदना सहन कराव्या लागू नयेत."
'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
"ऑपरेशनचे नाव पाहून मी खूप भावनिक झाले"
"ऑपरेशन सिंदूर असं नाव देऊन त्यांनी आम्हाला एक पर्सनल मेसेज दिला आहे की, आम्ही तुमच्यासाठी बदला घेतला आहे. ऑपरेशनचे नाव पाहून मी खूप भावनिक झाले आहे, शुभमचा फोटो पाहून मी एकटीच खूप रडले. सरकारने असंही सांगितलं की त्यांनी असं उत्तर दिले आहे की आता तुमची आमच्या देशातील कोणत्याही मुलाला किंवा नागरिकाला मारण्याची हिंमत होणार नाही."
"हा बदला आहे"
"आता आणखी एक शुभम या देशातून जाणार नाही. मला विश्वास आहे की, दहशतवादाचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी, उर्वरित दहशतवाद्यांना देखील टार्गेट केलं जाईल. हा बदला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की, दहशतवाद्यांना आणू नका, त्यांना सांगू नका. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, सैन्यानेही तेच केलं" असंही ऐशन्याने म्हटलं आहे.
"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
लोक जनशक्ती पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सैन्याच्या शौर्याचं आणि पराक्रमाचं कौतुक केलं. "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं. आम्ही भारतीय सैन्याला सलाम करतो. आपल्या शांत झोपेमागे सैन्याचा पराक्रम आणि बलिदान आहे. दहशतवाद्यांचे अड्डे अत्यंत सावधगिरीने उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममधील हिंदूंवरील हल्ल्याचा बदला आहे. भारताच्या अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण झाला आहे. त्यांनी दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईचं आश्वासन दिलं होतं" असं शांभवी चौधरी यांनी म्हटलं आहे.