ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा काश्मीर खोऱ्यात कसून शोध घेतला जात आहे. पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. सीमेवर तणाव असल्याने बीएसएफ डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांना भारतात घुसविण्यासाठी नेपाळच्या सीमेवर पाठविल्याचे समोर येत आहे.
गुप्तचर संस्थांनी नेपाळच्या सीमेवर सुमारे ३७ हून अधिक पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर दबा धरून बसल्याचा निरोप पोहोचविला आहे. यामुळे नेपाळच्या सीमेवर खळबळ उडाली असून सुरक्षा दलांनी नेपाळ सीमेवर गस्त वाढविली आहे. यासाठी अतिरिक्त दल तैनात करण्यात आले आहे.
हे संदिग्ध दहशतवादी असून कोणत्याही परिस्थितीत संधी मिळताच भारतात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. लष्करी सुत्रांनुसार लखनऊ, वाराणसी, अयोध्या आणि मथुरा या शहरांना हे दहशतवादी लक्ष्य करू शकतात. यामुळे बहराइच ते बलरामपूर पर्यंत नेपाळ सीमेवर १५०० अतिरिक्त एसएसबी जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच एसएसबी ४२ व्या बटालियनने सीमावर्ती भागात दुहेरी गस्त सुरु केली आहे. वनक्षेत्रात एक चौकी देखील उभारण्यात आली आहे. नेपाळमधून ये-जा करणाऱ्या लोकांची ओळखपत्रे तपासली जात आहेत.
तसेच उत्तर प्रदेशातील महाराजगंज, सिद्धार्थनगर, बलरामपूर, बहराइच, श्रावस्ती, पिलीभीत आणि नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या लखीमपूर खेरीमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पीएससी जवान, पोलिस आणि एसएसबी संयुक्तपणे सीमावर्ती भागात गस्त घालू लागले आहेत, असे जारवा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक गोविंद कुमार यांनी सांगितले. गुरुंग नाका चौकी परिसरातून दोन्ही देशांदरम्यानची वाहतूक रोखण्यात आली आहे. ग्राम सुरक्षा समित्या देखील सक्रिय करण्यात आल्या असून सीसीटीव्हींद्वारेही नजर ठेवली जात आहे.