पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद अशा ठिकाणांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तान माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचे घर सियालकोटमध्ये आहे.
सियालकोट हे शोएब मलिकचे वडिलोपार्जित गाव आहे. शोएबचा जन्म १ फेब्रुवारी १९८२ रोजी सियालकोट येथे एका पंजाबी राजपूत कुटुंबात झाला. त्यांचे वडील फकीर हुसेन यांचे चपलांचे दुकान होते. पाकिस्तान क्रिकेटमध्ये नाव, ओळख, प्रसिद्धी, पैसा मिळाल्यानंतर शोएब मलिकने सियालकोट सोडून कराचीमध्ये घर बनवले. आता तो कराचीमध्येच राहतो.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. हल्ल्याचे ठिकाण आधीच ओळखले गेले होते, जिथून भारतात दहशतवाद पसरवण्याचा कट रचण्यात आला होता. या हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनेला लक्ष्य करण्यात आले नाही. तसेच या हल्ल्यात पाकिस्तानातील सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला नाही, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले.