पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. या शिष्टमंडळांच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधी बनून गेलेले नेते विविध देशात भारताची भूमिका स्पष्ट करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेल्या शशी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे. आता महात्मा गांधींचा देशही कुठलीही घटना घडल्यावर आपला गाल पुढे करणार नाही. तर प्रतिक्रिया देईल, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे.
पनामा येथे भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शशी थरूर यांनी दहशतवादाविरोधातील भारताचा दृढ निश्चय अधोरेखित केला, ते म्हणाले की, आपण आपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी नेहमी उभे राहिले पाहिजे, असे महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आपल्या साहसी नेतृत्वाद्वारे आम्हाला शिकवले होते. आपण ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो. त्या मूल्यांच्या संरक्षणासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. भयापासून मुक्ती हीच एक गोष्ट आहे ज्यासाठी आपल्याला भारतामध्ये सध्याच्या दिवसांत त्या दृष्टांच्या हल्ल्यांविरोधात लढायचं आहे ज्यांना जह दहशतवादी म्हणून ओळखतात.
शशी थरूर पुढे म्हणाले की, ही अशी गोष्ट आहे की ज्यापुढे कोणताही देशभक्त देश झुकणार नाही. तसेच महात्मा गांधीं यांची भूमीही असं घडल्यावर आपला दुसरा गाल पुढे करणार नाही. आता आम्ही अशा हल्ल्यांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ, असा इशारा थरूर यांनी दिला. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर राहणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावरही शशी थरूर यांनी टीका केली.