जमिनीत धसलेला ट्रक अन् बोरिंग मशीन बाहेर काढल्यास काय होईल?; सगळेच गावकरी दहशतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:50 IST2025-01-03T16:47:25+5:302025-01-03T16:50:16+5:30
या पाण्याच्या दबावामुळे जमीन धसली आणि त्यात ट्रक आणि बोरिंग मशीनही बुडाली. २ दिवसाने अचानक पाण्याचा वेग कमी झाला.

जमिनीत धसलेला ट्रक अन् बोरिंग मशीन बाहेर काढल्यास काय होईल?; सगळेच गावकरी दहशतीत
जैसलमेर - राजस्थानच्या जैसलमेर इथं मोहनगड परिसरात घडलेल्या घटनेने सगळेच गावकरी दहशतीत आहेत. याठिकाणी ट्यूबवेल बोरिंगवेळी ट्रक आणि मशीन जमिनीत धसला. त्यानंतर भूगर्भातील प्रचंड दबावाने पाणी आणि गॅस बाहेर निघू लागला. पाण्याचा वेग पाहता आसपासच्या परिसरात काही क्षणात तळं साचलं. या घटनेनंतर ONGC च्या तांत्रिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली आणि तिथला आढावा घेतला आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर या पथकाने गावकऱ्यांशी संवाद साधला. जर हा ट्रक आणि बोरिंग मशीन बाहेर काढली तर अधिक धोका निर्माण होऊ शकतो. ट्रक आणि मशीन बाहेर काढणे खूप कठीण आहे जर हे केले तर याठिकाणी पुन्हा पाण्याच्या दाबाने जमीन खचण्याची शक्यता आहे. ट्रक आणि मशीन यांच्यामुळे पाण्याचा दबाव कमी झाला आहे. जर ते हटवले तर पाणी आणखी वेगात येऊ शकते. जमिनीत धसलेला हा ट्रक आणि मशीन काढायची की नाही याबाबत ओएनजीसी टीम रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना सोपवणार आहे.
ज्याठिकाणी ही घटना घडली आहे तिथे पाण्यासह गॅसचे बुडबुडे बाहेर निघत आहेत. जमिनीत धसलेला ट्रक आणि मशीन बाहेर काढण्यासाठी खर्च येईल पण त्याशिवाय अधिक इथली परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती ONGC च्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ज्या जागेवर बोरिंग केली जात होती तिथून पाण्याचा फवारा बाहेर पडत आहे ते पाणी ६० लाख वर्ष जुने असू शकते. जमिनीतून निघणारे पाणी आणि खारे पाणी यातून काही तज्ज्ञ हे पाणी समुद्राचं असू शकते असा दावा करत आहेत.
नेमकं काय घडलं?
२७ डिसेंबर रोजी जैसलमेरच्या मोहनगड परिसरात बोअरवेलच्या खोदकामावेळी अचानक जमिनीतून पाण्याचा फवारा बाहेर पडला. या पाण्याच्या दबावामुळे जमीन धसली आणि त्यात ट्रक आणि बोरिंग मशीनही बुडाली. २ दिवसाने अचानक पाण्याचा वेग कमी झाला. परंतु पाण्याचा वेग पुन्हा वाढण्याचीही भीती तज्ज्ञ व्यक्त करतायेत. सध्या या परिसरात प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून ५०० मीटर परिसर रिकामा केला आहे. याठिकाणी भेट देण्यासाठी आलेले भूजल तज्ज्ञ डॉ. नारायणदास इण्खिया यांनी पाण्याचा दबाव समुद्राच्या लाटांसारखा आहे ज्यामुळे सगळीकडे पाणी पसरत असल्याचं सांगितले.