बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:18 IST2026-04-12T14:17:41+5:302026-04-12T14:18:03+5:30
आगर माळवा येथील स्वामी विवेकानंद शाळेत मधमाशांच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
शाळेत परीक्षेचा पेपर सोडवत बसलेल्या निष्पाप मुलांवर निसर्गाने असा काही घाला घातला की संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यातील सोयत कला येथील स्वामी विवेकानंद शाळेत मधमाशांच्या झुंडीने शाळकरी मुलांवर भीषण हल्ला केला. या दुर्घटनेत ४थीत शिकणाऱ्या ९ वर्षीय रमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर ६ ते ७ मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी स्वामी विवेकानंद शाळेत परीक्षा सुरू होती. सर्व मुले वर्गात बसून पेपर लिहित असताना अचानक मधमाशांचा एक मोठा जथ्था शाळेत शिरला. काही कळायच्या आतच या माशांनी मुलांना डंख मारण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वर्गात एकच गोंधळ उडाला. मुले जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागली, मात्र आक्रमक मधमाशांनी त्यांना चोहोबाजूंनी घेरले.
९ वर्षांच्या रमनचा करुण अंत
या हल्ल्यात ९ वर्षांचा रमन हा सर्वात मोठा बळी ठरला. मधमाशांनी त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात डंख मारले की तो जागीच बेशुद्ध पडला. शाळेतील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले. रमनची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला राजस्थानमधील झालावाड येथे हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान या चिमुरड्याची प्राणज्योत मालवली. रमनच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शाळा प्रशासन वादाच्या भोवऱ्यात
या घटनेनंतर पालक आणि स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शाळेच्या आवारात किंवा इमारतीवर मधमाशांचे पोळे होते, तर ते आधीच का काढले गेले नाही? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. एका निष्पाप मुलाच्या मृत्यूला शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.
पोलीस तपास सुरू
सोयत पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मधमाशांचे पोळे अचानक कसे भडकले आणि त्यामागे कुणाचे काही कृत्य होते का, याचा शोध घेतला जात आहे. जखमी मुलांवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या घटनेने शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.