आता केजरीवालांचीही घोषणा! चंदीगढ, पंजाबमध्ये वेगळे लढणार; इंडिया आघाडी राहिलीच कुठे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 16:41 IST2024-02-10T16:41:21+5:302024-02-10T16:41:47+5:30
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याची घोषणा केली तेव्हाच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील पंजाबमध्ये एकटे लढणार असल्याचा सूर आळवला होता.

आता केजरीवालांचीही घोषणा! चंदीगढ, पंजाबमध्ये वेगळे लढणार; इंडिया आघाडी राहिलीच कुठे...
भाजप विरोधात मोर्चा उघडणाऱ्या इंडिया आघाडीचा सेनापतीच भाजपासोबत मांडी लावून बसला आहे. काँग्रेसच्या स्वार्थामुळे काही महिन्यांपूर्वी एकाच व्यासपीठावर आलेले इंडिया आघाडीचे नेते वेगवेगळ्या दिशांना जाऊ लागले आहेत. पहिले ममता बॅनर्जी, नंतर नितीशकुमार आता केजरीवाल. केजरीवालांनी आप चंदीगढ आणि पंजाबमध्ये वेगळी लढणार असल्याची घोषणा करून इंडिया आघाडीला आणखी एक मोठा झटका दिला आहे.
नुकतेच काही एजन्सींचे ओपिनिअन पोल आले आहेत. यानुसार पंजाबमध्ये आपला बऱ्यापैकी जागा मिळत असल्याचे दाखविण्यात आले आहे. असे असताना त्याच्या दोन दिवसांनी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. सध्यातही ते दिल्लीत इंडिया आघाडीसोबत आहेत.
आप पंजाब आणि चंदीगढच्या १४ जागांवर स्वतंत्र उमेदवार देणार आहे. ट्विटर अकाऊंटवर केजरीवाल यांनी व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे. पंजाबच्या 13 आणि चंदीगडच्या 1 जागेवर आप एकटाच लढणार आहे. झाडूचे बटण दाबा आणि 'आप'ला 14 पैकी 14 जागा जिंकू द्या, अशी मी विनंती करत असल्याचे केजरीवाल म्हणाले आहेत.
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याची घोषणा केली तेव्हाच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील पंजाबमध्ये एकटे लढणार असल्याचा सूर आळवला होता. आता त्याला केजरीवालांकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे इंडिया आघाडी बऱ्याच राज्यांत नाहीच अशी स्थिती झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील सपाने काँग्रेसला जागा जाहीर करून टाकल्या आहेत. तिथेही नाराजी आहे. नाही म्हणायला दक्षिणेत आणि महाराष्ट्रात काँग्रेससोबत तेथील स्थानिक पक्ष वेगवेगळ्या कारणांनी आहेत.