‘त्या’ संबंधांना नेहमीच बलात्कार म्हणता येणार नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:39 IST2020-12-18T04:39:23+5:302020-12-18T06:39:42+5:30
काही प्रकरणांमध्ये असते परस्पर संमती, आरोपीची निर्दोष मुक्तता

‘त्या’ संबंधांना नेहमीच बलात्कार म्हणता येणार नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल
नवी दिल्ली : एखाद्या महिलेने पुरुषाशी जिव्हाळ्याने दीर्घकाळ सलगी राखली असेल आणि लग्नाच्या आश्वासनानंतर त्यांच्यात निर्माण झालेल्या लैंगिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
लग्नाचे खोटे आश्वासन देऊन आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार एका महिलेने केली होती. या खटल्यातील आरोपीची दिल्ली उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
हा निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे की, पुरुषाने महिलेला लग्नाचे आश्वासन दिल्यामुळे त्यांच्यात प्रदीर्घ काळ लैंगिक संबंध कायम राहिले असतील असे सरसकट म्हणता येत नाही. न्या. विभू बाखरू यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, जोडीदाराला लग्नाचे वचन दिल्यानंतर काही प्रकरणांमध्ये स्त्री-पुरुष परस्पर संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित करीत असतात. कधी कधी तसे संबंध राखण्याची त्या जोडप्यापैकी एखाद्या व्यक्तीला मनातून इच्छा नसतानाही त्याला राजी व्हावे लागत असू शकते.
खोटे आश्वासन पडेल महागात
दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, लग्नाचे खोटे आश्वासन दिल्याच्या प्रकरणात पीडिता आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार करू शकते.
अशा प्रकरणांत दोषीला शिक्षा होऊ शकते. मात्र जोडप्यामध्ये दीर्घकाळ सलगीचे संबंध असतील तर अशा प्रकरणात बलात्काराचा आरोप करता येणार नाही.