Nirbhaya Case: केजरीवालांमुळे टळतेय दोषींची फाशी; निर्भयाच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 20:53 IST2020-01-31T20:46:46+5:302020-01-31T20:53:47+5:30

दोषींची फाशीची शिक्षा लांबणावर पडल्यानंतर निर्भयाच्या आई-वडिलांचे केजरीवालांवर आरोप

Nirbhaya Parents Blames cm Arvind Kejriwal For Execution Delay | Nirbhaya Case: केजरीवालांमुळे टळतेय दोषींची फाशी; निर्भयाच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप

Nirbhaya Case: केजरीवालांमुळे टळतेय दोषींची फाशी; निर्भयाच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चार गुन्हेगारांची फाशी पुन्हा एकदा टळली आहे. पुढील आदेश जारी करेपर्यंत दोषींना फाशी देऊ नका, असे आदेश दिल्लीतल्या एका न्यायालयानं तिहार तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे निर्भया प्रकरणातल्या दोषींची फाशी लांबणीवर पडली आहे. यासाठी निर्भयाच्या आईनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरलं आहे. तर केजरीवालांनी फाशीच्या शिक्षेला होत असलेल्या विलंबाला कायदे आणि त्यातल्या तरतुदी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय कायद्यात बदल आवश्यक असल्याचं मतदेखील नोंदवलं आहे

न्यायालयानं आज दोषींची फाशी पुढे ढकलली. आणखी किती दिवस अशीच टाळाटाळ सुरू राहणार?, असा सवाल निर्भयाच्या वडिलांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला. तुरुंग प्रशासन केजरीवालांच्या अखत्यारित येतं. संपूर्ण व्यवस्था त्यांच्या हातात आहे. त्यांच्यामुळेच सगळं काही थांबलं आहे, असे निर्भयाचे वडील म्हणाले. 




निर्भयाची आशा देवी यांनीदेखील सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. 'सरकारं आमचं सांत्वन करतात. कारण त्यांना मतं हवी असतात. सात वर्षांपूर्वी यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. महिला सुरक्षेचं आश्वासन दिलं. तेव्हापासून तिसऱ्यांदा मतदान होत आहे. मात्र आजही गुन्हेगारांचा वकील फाशीविरोधात मला आव्हान देऊन जात आहे,' अशा शब्दांत त्यांनी त्यांची व्यथा मांडली. 



मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कायद्यातल्या तरतुदींना जबाबदार धरत यात बदल करण्याची गरज व्यक्त केली आहे. 'निर्भयाचे दोषी कायदेशीर डावपेच वापरुन फाशी टाळत आहेत. त्यांना त्वरित फाशी व्हायला हवी. आपल्याला कायद्यात बदल करायला हवेत. बलात्कार प्रकरणांमध्ये सहा महिन्यांमध्ये फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे,' असं केजरीवालांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Web Title: Nirbhaya Parents Blames cm Arvind Kejriwal For Execution Delay