कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:01 IST2025-06-03T09:00:34+5:302025-06-03T09:01:08+5:30
दोघेही एकाच कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आहेत.

कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
कोटा (राजस्थान) : सराव परीक्षा आणि एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांवर भर तसेच वेळोवेळी ब्रेक घेणे यामुळे घवघवीत यश संपादन करता आले, असे यशाचे ‘गुपित’ रजित गुप्ता आणि सक्षम जिंदाल या विद्यार्थ्यांनी उघड केले. रजित आणि सक्षम देशात सर्वांत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षांपैकी एक जेईई ॲडव्हान्समध्ये पहिले दोन टॉपर आहेत. मेरिट यादीत रजित प्रथम तर सक्षम दुसऱ्या स्थानी आहे. दोघेही एकाच कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आहेत.
रजितला ३६० पैकी ३२२ गुण आहेत. तो म्हणतो- माझ्या मेहनतीला चांगले फळ मिळाले, याचा खूप आनंद आहे. मी दहावीपासूनच या परीक्षेची तयारी करीत होतो. काही खास आणि वेगळी तयारी केली असे नाही. दिलेला अभ्यास पूर्ण करणे वेळेवर मॉडेल्स सोडवणे, यावर मी पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. (वृत्तसंस्था)
उत्तर न जमल्यास...
मला एखाद्या प्रश्नाचे उत्तर जमले नाही तर मी थोडा ब्रेक घ्यायचो. माझ्या लहान बहिणीशी बोलायचो. मग माझा मूड फ्रेश व्हायचा. मी कधीही विचलित झालो नाही की मनात निराशा येऊ दिली नाही. त्याची पुस्तके रचून ठेवली तर ती त्याच्या उंचीपेक्षाही जास्त होतील. त्याने इतके डमी पेपर सोडवले की त्याचाही एक मोठा ढीग तयार होईल, या शब्दांत रजितचे वडील दीपक गुप्ता यांनी मुलाच्या मेहनतीचे वर्णन केले.
‘परदेशात जायचे नाही’
सक्षम हरयाणाच्या हिसार येथील रहिवासी आहे. त्याचे आई-वडील पॅथॉलॉजिस्ट आहेत. तो म्हणाला, मी दोन वर्षे कोटा येथे परीक्षेची तयारी करीत होतो. शिक्षक मला प्लॅन द्यायचे आणि त्याप्रमाणे मी अभ्यास करीत गेलो. मला गणिताची अडचण नव्हती. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांवर फोकस केला. सराव पेपर, त्याचे विश्लेषण याचा खूप फायदा होतो. चुका टाळता येतात. आयआयटी मुंबईला प्रवेश घेणे हे आता माझे ध्येय आहे. परदेशात जायचे आणि चांगल्या संधी शोधायच्या, हे सध्या डोक्यात नाही.