ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:50 IST2025-06-13T15:48:53+5:302025-06-13T15:50:00+5:30

राजा रघुवंशी हत्याकांडानंतर सोनमने इंदूरमध्ये तब्बल १४ दिवस वास्तव्य केले, पण याची कोणालाही कल्पना नव्हती.

Neither her in-laws nor her mother-in-law went... Where was Sonam for 14 days after the end of Raja Raghuvanshi? | ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?

ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?

मध्य प्रदेशातील इंदूर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. राजा याची पत्नी सोनम रघुवंशीने हनिमूनसाठी शिलाँगला गेले असताना आपल्या प्रियकराच्या मदतीने राजाची हत्या केली होती. या हत्याकांडानंतर सोनमने इंदूरमध्ये तब्बल १४ दिवस वास्तव्य केले, पण याची कोणालाही कल्पना नव्हती.

पूर्वनियोजित कट आणि फरार होण्याचे नियोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे रोजी शिलाँगमध्ये राजाची हत्या केल्यानंतर, सोनम २५ मे रोजी ट्रेनने इंदूरला परत आली. राजाच्या हत्येसोबतच सोनमने यानंतर कुठे आणि कसे राहायचे, याचेही सविस्तर नियोजन केले होते. म्हणूनच, इंदूरमध्ये आल्यानंतर ती तिच्या माहेरी किंवा सासरच्या घरी न जाता, एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. या फ्लॅटमधून ती राजाच्या बेपत्ता होण्याच्या आणि या प्रकरणाच्या बातम्यांवर लक्ष ठेवून होती. विशेष म्हणजे, हल्ल्यापूर्वी राजा आणि सोनम बराच वेळ एकत्र घालवत होते.

पोलिसांच्या कारवाईनंतर काढला पळ

जेव्हा पोलिसांना शिलाँगमधून काही महत्त्वाचे पुरावे सापडल्याचे सोनमला कळले, तेव्हा तिचा प्रियकर राज कुशवाहाने तिला सांगितले की, ती आता इंदूरमध्ये सुरक्षित नाही. त्यामुळे, इंदूर सोडल्यानंतर सोनम उत्तर प्रदेशातील राजच्या रामपूर गावी जाऊन राहिली. मात्र, अखेर पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि प्रियकर राज कुशवाहासह एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली.

९ लाख रुपये आणि दागिने घेऊन पळण्याचा प्रयत्न

जेव्हा सोनमला तिच्या साथीदारांना अटक झाल्याचे आणि आपले पितळ उघडे पडणार असल्याचे समजले, तेव्हा ती रामपूरहून गाजीपूरमधील एका ढाब्यावर गेली. सोनमने तिच्या प्रियकरासह राजाच्या हत्येचा संपूर्ण कट रचला होता. हत्येनंतर आर्थिक अडचण येऊ नये म्हणून ती घरातून ९ लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन निघाली होती.

पाच आरोपींना अटक, समोरासमोर चौकशी होणार?

आता पोलिसांनी राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी एकूण पाच जणांना अटक केली आहे, ज्यात सोनमचाही समावेश आहे. राज आणि सोनम या दोघांनीही राजाच्या हत्येची कबुली दिली आहे. मात्र, चौकशीदरम्यान ते अजूनही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि फिरवाफिरवी करणारी उत्तरे देत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपींची कसून चौकशी सुरू आहे आणि गरजेनुसार पाचही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल. यामुळे या प्रकरणातील आणखी काही गुंतागुंत समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Neither her in-laws nor her mother-in-law went... Where was Sonam for 14 days after the end of Raja Raghuvanshi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.