Sharad Pawar on Gyanvapi Mosque Case: “अयोध्येनंतर देशात शांतता नांदेल असं वाटलं होतं, पण...”; ज्ञानवापीवरुन शरद पवारांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 08:50 AM2022-05-25T08:50:59+5:302022-05-25T08:51:47+5:30

Sharad Pawar: नवनवीन विषय काढून देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी भाजपला हटवण्याचे ठरवले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले केली.

ncp chief sharad pawar criticized central modi govt and bjp over gyanvapi mosque controversy and other issues | Sharad Pawar on Gyanvapi Mosque Case: “अयोध्येनंतर देशात शांतता नांदेल असं वाटलं होतं, पण...”; ज्ञानवापीवरुन शरद पवारांनी सुनावले

Sharad Pawar on Gyanvapi Mosque Case: “अयोध्येनंतर देशात शांतता नांदेल असं वाटलं होतं, पण...”; ज्ञानवापीवरुन शरद पवारांनी सुनावले

googlenewsNext

Sharad Pawar on Gyanvapi Mosque Case: गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Mosque Controversy) वाद पुन्हा उफाळून आला आहे. या ठिकाणी शिव मंदिर असल्याचा दावा करत काही हिंदू संघटनांनी वाराणसी न्यायालयात धाव घेत सर्वेक्षण करण्याची मागणी केली. त्याचा अहवालही आता न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. तर या प्रकरणी मुस्लिम संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दखल देण्यास नकार दिला. यानंतर देशातील राजकीय वर्तुळात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ज्ञानवापी मशिदीच्या वादावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला सुनावले आहे.

केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. अयोध्या प्रकरण निकाली निघाल्यानंतर देशात शांतता नांदेल, असे आम्हाला वाटत होते. पण भाजपचा विचार आणि विचारसरणी वेगळी आहे. अशा प्रकारच्या धार्मिक विषयांना हवा देऊन देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला.

गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही

वाराणसीत मंदिर आहे. मंदिराला कुणाचा विरोध नाही. पण मंदिराजवळ मशीदही आहे. आज मशिदीवरून नवा मुद्दा उपस्थित करून देशात जातीय वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही खूप जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही. अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा ऐरणीवर आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व संघटना या कामात सहभागी झाल्या आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे. या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यावर देशासोबतच जगभरातील लोकही अभिमान बाळगतात. ताजमहालसारखी वास्तुकला ही आपल्या देशाची ओळख आहे. आज राजस्थानचा कोणीतरी समोर येतो आणि म्हणतो की ताजमहाल आमचा आहे. आमच्या पूर्वजांनी ते बनवले, असे टीकास्त्र शरद पवार यांनी सोडले. 

सर्व राजकीय पक्षांना एकत्रितपणे पावले उचलावी लागतील

एक मुद्दा संपला की नवा मुद्दा समोर आणायचा, असा त्यांचा अजेंडा आहे. काहीही करून देशात हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव कायमच संपला पाहिजे, असे भाजपचे धोरण असल्याची टीका करत, आज देशातील महिलांना घर चालवणे कठीण झाले आहे. महागाई वाढली आहे. मात्र महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नाहीत. बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यांना उत्तर देण्याचा एकच मार्ग आहे. जातीयवादी विचारांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्रितपणे पावले उचलावी लागतील, असे शरद पवार म्हणाले.

देशाची खरी समस्या महागाई, बेरोजगारी आहे

दिल्लीचा कुतुबमिनार कोणी बांधला हे जगाला माहीत आहे. तेथील न्यायालय यासंदर्भात निर्देश देणार आहे. पण काही लोक कुतुबमिनार हिंदूंनी बांधल्याचा दावा करत आहेत. मी या सगळ्या गोष्टी यासाठी सांगतोय कारण आज देशाची खरी समस्या महागाई, बेरोजगारी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जातीयवादी, सांप्रादायिक विचारांना चालना दिली जात आहे, या शब्दांत शरद पवार यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा राष्ट्रवादीने ममताजींना पाठिंबा दिला होता. बंगालमध्ये जातीयवादी विचारांविरुद्ध लढण्याची गरज होती. त्यामुळेच आम्ही ममता बॅनर्जींना मदत करण्याचा निर्णय घेतला. तुम्हा सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की, देशातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी भारतीय जनता पक्षाला हटवण्याचा कार्यक्रम स्वीकारण्याचे ठरवले आहे. या कामात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असेल, असे शरद पवार यांनी नमूद केले. 
 

Web Title: ncp chief sharad pawar criticized central modi govt and bjp over gyanvapi mosque controversy and other issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.