महिला लाजायच्या पतीचं नाव घ्यायला, मतदार यादीत स्थान मिळायचं 'धोंडू-पांडू'च्या पप्पाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 06:43 IST2026-01-25T06:42:35+5:302026-01-25T06:43:15+5:30
National Voters Day: स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात समाजातील रुढी-परंपरांचा जनजीवनावर मोठा प्रभाव होता. तेव्हा बहुतांश गृहिणी महिला पतीचे नाव घेताना लाजायच्या. महिलांकडून पतीचे नाव विचारल्यावर थेट नाव सांगण्याऐवजी ‘धोंडूचे आप्पा, पांडूचे अण्णा, सखूचे नाना, मुन्नीके अब्बा’, अशाच ओळखी द्यायच्या.

महिला लाजायच्या पतीचं नाव घ्यायला, मतदार यादीत स्थान मिळायचं 'धोंडू-पांडू'च्या पप्पाला!
- कुंदन पाटील
जळगाव - स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात समाजातील रुढी-परंपरांचा जनजीवनावर मोठा प्रभाव होता. तेव्हा बहुतांश गृहिणी महिला पतीचे नाव घेताना लाजायच्या. महिलांकडून पतीचे नाव विचारल्यावर थेट नाव सांगण्याऐवजी ‘धोंडूचे आप्पा, पांडूचे अण्णा, सखूचे नाना, मुन्नीके अब्बा’, अशाच ओळखी द्यायच्या. नाईलाजाने कर्मचाऱ्यांवरही हीच नावे मतदार यादीत नोंदवायची वेळ यायची. परिणामी, १९५१ मधील जनगणनेनुसार मतदार यादीतील ‘आप्पा, अण्णा, बाबा, अब्बा’ अशा संबोधनावर आधारित तब्बल २८ लाख मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याची आठवण निवडणूक विश्लेषकांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त करून दिली आहे.
तुम्हाला माहिती आहे का?
१. देशातील पहिला मतदार म्हणून २५ ऑक्टोबर १९५१ रोजी हिमाचल प्रदेशातील कल्पामध्ये निवडणूक ड्युटीवर असलेले शिक्षक श्यामसरण नेगी यांनी मतदान केले.
२. साक्षरतेचे प्रमाण अल्प असतानाही पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाद मतांची संख्या शून्य होती, हे विशेष. १९५१ च्या पहिल्या निवडणुकीत साधारणतः एटीएम कार्डच्या आकाराची मतपत्रिका होती. तिच्यावर संकेतांक असायचा.
१९५१ मध्ये काय घडले?
१९५१ ला जम्मू काश्मीर वगळता देशात ३६.११ कोटी लोकसंख्येपैकी १७.३२ कोटी नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती.
१९५१ च्या यादीतून तब्बल २८ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. देशाच्या इतिहासात एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वगळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.
-अभियंता एम.एम.पाटील, निवडणूक विश्लेषक