१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 16:48 IST2025-05-04T16:45:50+5:302025-05-04T16:48:25+5:30
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पहलगामधील एका दुकानदाराची संशयाच्या आधारे चौकशी केली जात आहे.

१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २५ पर्यटकांसह एका स्थानिकाची दहशतावाद्यांनी हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या तपासासाठी सुरक्षा यंत्रणांकडून मोहिम राबवण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात आहे. या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. अशातच पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएकडून एका दुकानदाराची चौकशी करण्यात येत आहे. संशयाच्या आधारावर एनआयने या व्यक्तीची चौकशी सुरु केली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील एका स्थानिक व्यक्तीने पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे १५ दिवस आधी आपले दुकान सुरू केले होते. मात्र हल्ल्याच्या दिवशी या व्यक्तीचे दुकान बंद होते. याच आधारावर एनआयला या व्यक्तीवर संशय आल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेसह अनेक केंद्रीय संस्थांचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.
२२ एप्रिल रोजी झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करत आहेय तपासाचा एक भाग म्हणून, एनआयएने जवळपास १०० स्थानिक लोकांची चौकशी केली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, चौकशीदरम्यान केंद्रीय एजन्सीला त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळाली. घटनेच्या दिवशी त्या व्यक्तीने आपले दुकान उघडले नव्हते, असे स्थानिकांनी तपास यंत्रणेला सांगितले. तपास यंत्रणेकडून त्या व्यक्तीचे इंटरनेट प्रोटोकॉल रेकॉर्ड देखील तपासले जात आहेत. एनआयएच्या पथकाने त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व स्थानिक लोकांची यादी तयार केली आहे. यामध्ये पोनी रायडर्स, दुकानदार, फोटोग्राफर आणि साहसी क्रीडा खेळामध्ये सहभागी असलेले लोक आहेत. त्यांच्यापैकी काहींनी एनआयएला सांगितले की दहशतवाद्यांनी त्यांना बोलण्याच्या बोलण्यावरून किंवा धर्म सांगिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
दरम्यान, एनआयएने एका पर्यटकाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओंपैकी एकामध्ये अल्लाहू अकबर म्हणत असलेल्या झिपलाइन ऑपरेटरची चौकशी केली होती आणि नंतर त्याला क्लीन चिट दिली. चौकशी केल्यानंतर तो अल्लाहू अकबर म्हणत असताना घाबरला आणि लगेचच घटनास्थळावरून निघून गेला. घरी पोहोचल्यानंतरही त्याने पोलिसांनाही याची माहिती दिली नाही. संध्याकाळी उशिरा त्याने त्याच्या मित्राला फोन केला होता असे तपासात समोर आले.
केंद्रीय गृह मंत्रालयाने पहलगाम हल्ल्याचा तपास जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून एनआयएकडे सोपवला आहे. सीमेपलीकडून रचलेल्या मोठ्या कटाचा भाग म्हणून हा हल्ला करण्यात आला. ऑगस्ट २०२३ मध्ये दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात तीन लष्करी जवानांच्या हत्येत दहशतवाद्यांचा हाच गट सहभागी होता का, याचाही तपास एनआयए करत आहे.