गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:31 IST2025-06-09T19:30:37+5:302025-06-09T19:31:10+5:30
Narendra Modi 11 Years as PM: गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती यश आले, किती अपयश आले, त्यांच्यासमोर कोणती संकटे आली याबाबत निवडणुकीचे एक्झिट पोल घेणाऱ्या सी व्होटरचा सर्व्हे आला आहे.

गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले त्याला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदींना किती यश आले, किती अपयश आले, त्यांच्यासमोर कोणती संकटे आली याबाबत निवडणुकीचे एक्झिट पोल घेणाऱ्या सी व्होटरचा सर्व्हे आला आहे. यामध्ये देशाची सुरक्षा ते दहशतवादाविरोधातील कारवाई यासह महागाई, रोजगारासह अनेक विषयांवर लोकांना प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये देशाच्या सुरक्षेसाठी मोदींनी लोकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मोदी सरकारची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे ५३.९%, चांगली १३.४%, सरासरी १२.०% आणि वाईट असल्याचे १६.५% लोकांनी म्हटले आहे. तसेच महागाईवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकार यशस्वी ठरल्याचे २६% लोकांनी म्हटले आहे. तर काही प्रमाणात यशस्वी असल्याचे २३.९%, कोणताही बदल नाही असे १७.६% आणि काही प्रमाणात अयशस्वी असे ५.२% तर पूर्णपणे अप्रभावी ठरल्याचे २४.८% लोकांनी म्हटले आहे.
एवढेच नाही तर बेरोजगारीच्या प्रश्नावरही लोकांनी मोदी कितपत यशस्वी आणि अपयशी ठरलेत ते देखील सांगितले आहे. बेरोजगारी संपविण्यात मोदी सरकार प्रभावी ठरल्याचे २६.३%, काही प्रमाणात प्रभावी ठरल्याचे २७.९%, कोणताही बदल नाही असे १९.९%, काही प्रमाणात अप्रभावी असे ७% तसेच पूर्णपणे अप्रभावी ठरल्याचे १५% लोकांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी ज्या मुद्द्यावर निवडून आले तो म्हणजे भ्रष्टाचाराचा मुद्दा, यात ते कितपत यशस्वी झालेत हे देखील लोकांनी या सर्व्हेत सांगितले आहे. मोदी भ्रष्टाचार कमी करण्यात यशस्वी झाल्याचे ३०.८% लोकांना वाटत आहे. काही प्रमाणात तो कमी झाला आहे असे १८.३%, काही प्रमाणात भ्रष्टाचार आहे असे २६.२%, भ्रष्टाचार फारसा कमी झालेला नाही असे १०.१%, अजिबात कमी झालेला नाही असे १३.३% लोकांना वाटत आहे.
तसेच मोदी सरकारमध्ये सर्वात प्रभावी सुधारणा म्हणजे डिजिटल इंडिया ही आहे. १९.९% लोकांनी याला मत दिले आहे. यानंतर जीएसटी ११.५%, मेक इन इंडिया १०%, सीएए ९.१%, कलम ३७० १८.१%, जन धन-आधार-मोबाइल-९.१% व इतरला १६.६ लोकांनी मत दिले आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रकारे हाताळले असे ४२.७% लोकांनी म्हटले आहे. अंशतः प्रभावीपणे हाताळल्याचे २२.६% लोकांना वाटत आहे तर कोणताही बदल नाही असे १३.७% लोकांना वाटत आहे.