राम कथेवर आधारित ‘राम रसायन’ पुस्तकाचे मुरारी बापू यांच्या हस्ते प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:19 IST2026-01-22T12:18:49+5:302026-01-22T12:19:17+5:30
'Rama Rasayan' Book: राम कथेवर आधारित कॉफी टेबल बुक ‘राम रसायन’ याचे प्रकाशन संत श्री मोरारी बापू यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

राम कथेवर आधारित ‘राम रसायन’ पुस्तकाचे मुरारी बापू यांच्या हस्ते प्रकाशन
'Rama Rasayan' Book: राम कथेवर आधारित कॉफी टेबल बुक ‘राम रसायन’ याचे प्रकाशन हा एक महत्त्वाचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होता. प्रसिद्ध राम कथावाचक मुरारी बापू यांच्या उपस्थितीत ‘राम रसायन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आचार्य लोकेश मुनी आणि डॉ. विजय दर्डा मंचावर उपस्थित होते. ‘राम रसायन’ हे एक अतिशय अद्वितीय कॉफी टेबल बुक आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनाचे तत्वज्ञान आणि ‘रामचरितमानस’ याचा सखोल आणि विस्तृत विचार आधुनिक आणि कलात्मक पद्धतीने ‘राम रसायन’ पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाला आध्यात्मिक, सामाजिक आणि माध्यम जगतातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.
लोकमत मीडियाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ येथे ६ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान राम कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘राम रसायन’ हे कॉफी टेबल बुक संत श्री मोरारी बापू यांच्या राम कथेवर आधारित आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या या प्रकाशन समारंभात यवतमाळ आणि विदर्भातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
परमपूज्य श्री मोरारी बापू यांची राम कथा १७ ते २५ जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अहिंसा विश्व भारती आणि जागतिक शांती केंद्राचे संस्थापक जैन आचार्य लोकेश मुनी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. ही कथा दररोज सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत होत आहे.
‘राम रसायन’ या पुस्तकाबद्दल
‘राम रसायन’ हे नाव हनुमान चालिसातील "राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा" या ओळीतून घेण्यात आले आहे. यातील ‘रसायन’ म्हणजे जीवनातील दुःख दूर करणारे आणि आनंदाने भरणारे औषध किंवा अमृत, असा घेण्यात आला आहे. हे केवळ सामान्य पुस्तकासारखे फक्त मजकुरावर आधारित नाही. वाचकांना चित्रांद्वारे प्रभू श्रीरामांचे चरित्र पाहता, अनुभवता यावे, यासाठी यात उच्च दर्जाची चित्रे, रेखाचित्रे आणि सुंदर सुलेखन वापरण्यात आले आहे. या पुस्तकात रामायणातील विविध भाग, मर्यादा पुरुषोत्तम यांची जीवनमूल्ये आणि मुरारी बापू यांच्या कथांमधील ठळक मुद्दे संकलित करण्यात आले आहेत.