कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:10 IST2025-05-24T11:40:47+5:302025-05-24T12:10:09+5:30
Monsoon, Rain Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार वळवाचा पाऊस सुरु आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज होता, तो खरा ठरला आहे.

कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
मान्सूनपूर्वीच देशभरात पावसाला सुरुवात झाली आहे. सृष्टी नवचैतन्याने न्हालेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला उकाडा आता शमला आहे. उत्तर भारतात सध्या उकाड्याला सुरुवात झालेली असली तरी आज दिल्लीत ६० किमी ताशी वेगाने वारे वाहणार तसेच पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशातच मान्सून केरळमध्ये पोहचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार वळवाचा पाऊस सुरु आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज होता, तो खरा ठरला आहे. मान्सूनसाठी अनुकुल परिस्थिती बनली असून रेंगाळण्याची सूतराम शक्यता नाही. यामुळे बळीराजानेही लगबग सुरु केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा पुढील आठवडाभरात मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनने १६ वर्षांपूर्वीचा योग साधला आहे.
असे आहे रेकॉर्ड...
यापूर्वी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून लवकर आला होता. २३ मेच्या आसपास मान्सून केरळात पोहोचण्याची ही दोन वर्षे सोडली तर इतर वेळी मान्सून उशिरानेच आला होता. अनेकदा तर अल निनोसारख्या प्रभावामुळे मान्सून केरळच्या वेशीवरच रेंगाळला होता. यामुळे पुढेही तो जून संपला तरी पोहोचू शकलेला नव्हता. केरळमध्ये सरासरी मान्सून दाखल होण्याची तारीख १ जून आहे. परंतू, १९१८ मध्ये सर्वात आधी म्हणजेच ११ मे रोजी दाखल झाला होता. तर सर्वात उशिरा १९७२ मध्ये दाखल झाला होता. २०१६ मध्ये मान्सून ९ जूनला दाखल झाला होता.
येत्या २४ तासांत...
हवामान विभागानुसार केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आयएमडीचा अंदाज २७ मे होता, त्यापूर्वीच पाऊस दाखल झाला आहे. याच काळात हा मान्सून नैऋत्य मान्सून दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर या भागात पुढे सरकणार आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, यामुळे मान्सूनच्या प्रवासासाठी पुढील ३६ तास महत्वाचे आहेत. पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस आणि वारा यामध्ये बदल होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.