'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:52 IST2025-09-17T15:50:06+5:302025-09-17T15:52:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकता यात्रेची आठवण त्यांनी सांगितली.

'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अभिष्टचिंतन केले. यावेळी त्यांनी १९९२-९३ मध्ये घडलेल्या घटनेची आठवणही सांगितली. भारतीय जनता पक्षाने १९९२ मध्ये कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत एकता यात्रा काढली होती. त्यावेळी पहिल्यांदा आपण नरेंद्र मोदींना भेटलो. त्यानंतर घडलेल्या घटनेलाही त्यांनी उजाळा दिला.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली एकता यात्रा काढण्याचा निर्णय झाला. या यात्रेच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी नरेंद्र मोदींवर सोपवली गेली होती."
"तिथे मी पहिल्यांदा मोदींना जवळून बघितलं"
चौहान म्हणाले, "त्यावेळी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी हैदोस घातलेला होता. लाल चौकात तिरंगा फडकावणे अशक्य असल्याचे म्हटलं जात होतं. जेव्हा २६ जानेवारी रोजी यात्रा श्रीनगरमध्ये पोहोचली, ती मोदींच्या नियोजनामुळे."
"मी त्या यात्रेत सहभागी झालो होतो. तिथे मी मोदींना पहिल्यांदा जवळून बघितलं. त्यांच्यामध्ये एक जिद्द, धाडस आणि ध्येयवेडेपणा होता. त्यांना लाल चौकात काहीही करून तिरंगा ध्वज फडकवायचा होता. पण, श्रीनगरमध्ये पोहोचल्यावर सुरक्षेच्या कारणामुळे हजारो कार्यकर्त्यांना लाल चौकात जाण्यापासून रोखले गेले. कार्यकर्ते निराश झाले", अशी आठवणी चौहान यांनी सांगितली.
मोदीजी रात्रभर झोपले नाही
शिवराज सिंह चौहान त्यानंतरचा किस्सा सांगताना म्हणाले, "नंतर मोदीजी, जम्मूला परतले. कार्यकर्त्यांना भेटले. तेव्हा त्यांचा कंठ दाटून आला होता. मी पहिल्यांदा कठोर दिसणारे, दृढ निश्चयी दिसणारे मोदी किती संवेदनशील व्यक्ती आहेत. ते रात्रभर झोपले नाही. त्यांना एकच सल होती की, कार्यकर्त्यांना लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही", अशी १९९२ मधील आठवण चौहान यांनी सांगितली.