"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:27 IST2025-06-14T15:28:09+5:302025-06-14T16:27:37+5:30
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या अपघातात आतापर्यंत २७५ ...

"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या अपघातात आतापर्यंत २७५ जणांना जीव गमवावा लागला. यापैकी २४१ हे एअर इंडियाच्या विमानातील प्रवासी होती. हे सर्वजण लंडन येथे जात होते. मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळलं आणि मोठी जीवितहानी झाली. या भीषण दुर्घटनेवर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली आहे. पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाला माहिती दिली होती पण त्यांचा नंतर संपर्क होऊ शकला नाही असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा यांनी सांगितले.
अहमदाबादमध्येएअर इंडियाचं अहमदाबाद-लंडन एआय-१७१ हे ड्रिमलायनर विमान गुरुवारी अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळले. एअर इंडियाचं ड्रीमलायनर विमान विमानतळापासून जवळच असलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी क्वार्टर व मेस हॉलमध्ये कोसळलं. या दुर्घटनेचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. त्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या अपघाताबाबत माहिती दिली आहे. अपघातापूर्वी विमानाने पॅरिसहून दिल्ली आणि नंतर दिल्लीहून अहमदाबादला कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास केला होता, असं सरकारने शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
"विमानाने दुपारी १:३९ वाजता उड्डाण केले. सुमारे ६५० फूट उंचीवर पोहोचल्यानंतर, त्याची उंची कमी होऊ लागली. वैमानिकाने दुपारी १:३९ वाजता एटीसीला आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली. एटीसीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. १ मिनिटानंतर, विमान विमानतळापासून २ किमी अंतरावर असलेल्या मेघानी नगर भागात कोसळले. या अपघातापूर्वी त्या विमानाने पॅरिसहून दिल्ली आणि दिल्लीहून अहमदाबादला कोणत्याही अडचणीशिवाय उड्डाण पूर्ण केले होते. अपघातामुळे, विमानतळ दुपारी २.३० वाजता बंद करण्यात आले. सर्व प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतर ते संध्याकाळी ५ वाजता उघडण्यात आले," असं मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा म्हणाले.
#WATCH | #AhmedabadPlaneCrash | Delhi: Samir Kumar Sinha, Secretary of the Ministry of Civil Aviation, says "On 12th June around 2PM, we received the information that the plane going from Ahmedabad to Gatwick London had crashed. We immediately got detailed information about this… pic.twitter.com/AtrriJeCQn
— ANI (@ANI) June 14, 2025
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापु यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. "गेले दोन दिवस खूप कठीण गेले. अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. काय करावे, कोणती मदत करावी हे पाहण्यासाठी मी स्वतः घटनास्थळी गेलो होतो आणि गुजरात सरकारचाही असाच दृष्टिकोन होता. भारत सरकार आणि मंत्रालयातील इतरांचाही असाच दृष्टिकोन होता. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला दिसले की सर्व संबंधित विभागांची पथके काम करत होती, शक्य तितके बचाव करण्याचा प्रयत्न करत होते, आग विझवण्याचा आणि ढिगारा काढण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून मृतदेह लवकरात लवकर रुग्णालयात पाठवता येतील, असं राम मोहन नायडू किंजरापु म्हणाले.