ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मार्क टली यांचे ९० व्या वर्षी निधन; एक 'दिग्गज' आवाज हरपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 17:14 IST2026-01-25T17:12:48+5:302026-01-25T17:14:00+5:30
Mark Tully Death: पद्मभूषण विजेते आणि बीबीसीचे माजी पत्रकार मार्क टली यांचे निधन, पत्रकारिता विश्वावर शोककळा.

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मार्क टली यांचे ९० व्या वर्षी निधन; एक 'दिग्गज' आवाज हरपला
नवी दिल्ली: प्रख्यात ब्रिटीश पत्रकार आणि लेखक मार्क टली यांचे रविवारी नवी दिल्लीत निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते आणि दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे निकटवर्तीय आणि ज्येष्ठ पत्रकार सतीश जेकब यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
२४ ऑक्टोबर १९३५ रोजी कोलकात्यात जन्मलेल्या मार्क टली यांचे भारताशी विशेष नाते होते. बीबीसीचे नवी दिल्ली ब्यूरो प्रमुख म्हणून त्यांनी तब्बल २२ वर्षे काम केले. भारताचा इतिहास, संस्कृती आणि राजकारण जगासमोर मांडण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध, ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या, भोपाळ गॅस गळती आणि बाबरी मशीद विध्वंस यांसारख्या ऐतिहासिक घटनांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले होते.
मार्क टली यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल २००२ मध्ये ब्रिटनचा 'नाइटहूड' सन्मान मिळाला होता, तर भारत सरकारने २००५ मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले होते.
त्यांनी भारतावर अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली, ज्यात 'नो फुल स्टॉप्स इन इंडिया', 'इंडिया इन स्लो मोशन' आणि 'द हार्ट ऑफ इंडिया' यांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाने भारतीय समाजाचा सखोल अभ्यास करणारा आणि निपक्षपाती पत्रकारिता करणारा एक महान स्तंभ कोसळला आहे.